पंढरपूरात शिंदे गटाविरोधात शिवसेना आक्रमक, दोन नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारले, जोरदार घोषणाबाजी

| Updated on: Sep 20, 2022 | 1:46 PM

शिवसेनेविषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

पंढरपूरात शिंदे गटाविरोधात शिवसेना आक्रमक, दोन नेत्यांच्या प्रतिमेला जोडे मारले, जोरदार घोषणाबाजी
पंढरपूरमध्ये शिवसैनिकांचं आंदोलन
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

रवी लव्हेकर, पंढरपूरः शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरेंविषयी (Uddhav Thackeray) वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या रामदास कदम (Ramdas Kadam) यांच्याविरोधात राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. पंढरपूर येथेही याचे पडसाद उमटले. येथील शिवसैनिकांनी रामदास कदम आणि येथील शिंदे गटातील आमदार शहाजी बापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन केलं. सोलापूर जिल्हा शिवसेना प्रमुख संभाजी शिंदे, पंढरपूर शहर प्रमुख रवी मुळे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन झालं. येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात झालेल्या आंदोलनावेळी रामदास कदम, आमदार शहाजी बापू पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी केली. शिवसेने विषयी बेताल वक्तव्य करणाऱ्या गद्दारांना जशास तसे उत्तर दिले जाईल, असा इशारा जिल्हा प्रमुख संभाजी शिंदे यांनी दिला आहे.

रामदास कदमांच्या वक्तव्यावरून वाद

शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी दापोली येथील सभेत केलेल्या वक्तव्यावरून शिवसेना नेते संतप्त आहेत. मी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा आहे, हे किती वेळा सांगाल? तुम्हाला शंका आहे का, अशा शब्दात रामदास कदमांनी टीका केली. यावरून मुंबईसह कोकणातील शिवसेना नेत्यांच्या आक्रमक प्रतिक्रिया येत आहेत. तसेच उद्धव ठाकरे कुठेही गेले तरी रश्मी वहिनी त्यांच्यासोबत असायच्या. माँसाहेब मीनाताई ठाकरे या आयुष्यात कधीही व्यासपीठावर चढल्या नाहीत… अशी टीका रामदास कदम यांनी केली होती.

किशोरी पेडणेकरांचं प्रत्युत्तर

मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी या वक्तव्यानंतर रामदास कदम यांचा खरपूस समाचार घेतला. आम्ही तुम्हाला भाई म्हणत होतो, पण तुम्ही भयंकर निघालात. किचनपर्यंत टीका करण्याइतपत तुमची जीभ सैल सुटली, असं वक्तव्य पेडणेकर यांनी केलं. उद्धव ठाकरे आणि मातोश्रीबाबत वापरलेली भाषा राजकारणातली नाही. तसं असतं तर आम्हीही तुमच्या आईला तुमच्या बापाचं नाव विचारायला हवं का, असा सवाल किशोरी पेडणेकर यांनी केला.