Devendra Fadnavis : ‘केंद्रातील नेतृत्वाने फडणवीसांचा शंकरराव चव्हाण केला’, प्रकाश आंबेडकरांचा टोला; पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं? वाचा सविस्तर

| Updated on: Jul 01, 2022 | 7:53 PM

प्रकाश आंबेडकर यांनी 'बिचारे देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नेतृत्वाने त्यांचा शंकरराव चव्हाण केला', असं ट्वीट करत टोला लगावला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबाबत नेमकं काय घडलं होतं, हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.

Devendra Fadnavis : केंद्रातील नेतृत्वाने फडणवीसांचा शंकरराव चव्हाण केला, प्रकाश आंबेडकरांचा टोला; पण तेव्हा नेमकं काय घडलं होतं? वाचा सविस्तर
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री देवेंद्र पडणवीस
Image Credit source: Twitter
Follow us on

पुणे : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकार कोसळलं. त्या दिवसापासून भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार अशी चर्चा राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या तोंडावर होती. फडणवीस मुख्यमंत्री तर शिंदे उपमुख्यमंत्री असं चित्रही सर्वांनी पाहिलं असेल. मात्र, सरकार स्थापनेच्या दाव्यानंतर चित्र पालटलं. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या नावाची घोषणा केली. तसंच आपण सत्तेच्या बाहेर असू, मात्र हे सरकार चालेल ही माझी जबाबदारी असल्याचं त्यांनी आवर्जुन सांगितलं. मात्र, अवघ्या दोन तासांत केंद्रीय पातळीवर मोठ्या हालचाली झाल्या आणि देवेंद्र फडणवीसांना उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घ्यावी लागली. या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) यांनी ‘बिचारे देवेंद्र फडणवीस, केंद्रातील नेतृत्वाने त्यांचा शंकरराव चव्हाण केला’, असं ट्वीट करत टोला लगावला होता. मात्र, माजी मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्याबाबत नेमकं काय घडलं होतं, हे जाणून घेणंही तितकंच महत्वाचं आहे.

शंकरराव चव्हाणांबाबत पुलोद सरकारमध्ये नेमकं काय घडलं होतं?

शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री असताना शरद पवार हे त्यांच्या मंत्रिमंडळातील सर्वात तरुण मंत्री होते. पुढे 1978 साली विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि राज्यात शरद पवार यांच्या नेतृत्वात पुरोगामी लोकशाही दल अर्थात पुलोदचं सरकार आलं. या सरकारमध्ये शरद पवार हे मुख्यमंत्री होते. तर त्यांच्या मंत्रिमंडळात शंकरराव चव्हाण हे मंत्री म्हणून सामिल झाले होते. तेव्हा शंकरराव चव्हाण यांना मुख्यमंत्र्यांच्या केबिन बाहेर ताटकळत उभे राहावे लागले होते, असाही एक किस्सा राजकीय वर्तुळात चर्चिला जातो.

चव्हाणांच्या मंत्रिमंडळात पवार, तर पवारांच्या मंत्र्यांमध्ये चव्हाणांचा सहभाग!

आणीबामीनंतर महाराष्ट्रात 1978 साली विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यावेळी राज्यात जनता दलाला सर्वाधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र, एकमेकांविरोधात लढलेल्या यशवंतराव चव्हाण यांच्या ‘अर्स काँग्रेस’ आणि ‘इंदिरा काँग्रेस’ यांनी निकालानंतर एकत्र येत ‘अर्स काँग्रेस’च्या वसंतदादा पाटील यांच्या नेतृत्वात सरकार स्थापन केलं. वसंतदादांच्या मंत्रिमंडळात असलेल्या शरद पवार यांनी सरकारविरोधात बंड केलं आणि जनता दल, शेतकरी कामगार पक्ष आणि शंकरराव चव्हाण यांची महाराष्ट्र समाजवादी काँग्रेस जिला उपहासाने मस्का म्हणून ओळखलं जायचं. या पक्षांना एकत्र आणून स्वत:च्या नेतृत्वाखाली पुलोद सरकार स्थापन केलं.

या पुलोद सरकारमध्ये माजी मुख्यमंत्री असलेले शंकरराव चव्हाण एक मंत्री म्हणून सहभागी झाले होते. त्यामुळे मुख्यमंत्री शंकरराव चव्हाण यांच्या मंत्रिमंडळात मंत्री असलेले शरद पवार आता मुख्यमंत्री बनले होते. तर एकेकाळचे मुख्यमंत्री असलेले चव्हाण पवारांच्या हाताखाली मंत्री म्हणून काम करत होते. नेमका हाच संदर्भ प्रकाश आंबेडकर यांनी दिला आणि फडणवीसांना टोला लगावला आहे.