Kirit somaiya | मलिकांचे दाऊदशी तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर नवा आरोप

| Updated on: May 24, 2022 | 10:27 AM

मुंबई महापालिकेच्या एका सर्टिफिकेटनुसार, समर्थ इरेक्टर्सकडून श्रीधर पाटणकर यांनी टीडीआर विकत घेतला आहे. म्हणजेच बिमल अग्रवाल यांच्याकडून.. बोगस बुलेटप्रुफ जॅकेट देणाऱ्याकडून श्रीधर पाटणकरांनी टीडीआर विकत घेतला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

Kirit somaiya | मलिकांचे दाऊदशी तर उद्धव ठाकरेंच्या पार्टनरचे संबंध कसाबपर्यंत, किरीट सोमय्यांचा ठाकरे सरकारवर नवा आरोप
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

पुणेः अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांचे दाऊदशी संबंधित व्यक्तींशी संबंध असल्याचे उघड झाल्यानंतर शिवसेनादेखील मागे नाही, असा आरोप किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी केलाय. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी आज पुण्यात पत्रकार परिषद घेत उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या पार्टनरचे थेट कसाबशी संबंध असल्याचा खळबळजनक आरोप केला. पाकिस्तानातून आलेल्या कसाबशी झुंज देताना पोलीस अधिकारी हेमंत करकरेंचा मृत्यू झाला होता. कसाबने तर गोळ्या घातल्याच पण करकरेंनी जे बुलेटप्रुफ जॅकेट घातलं होतं, ते बोगस होतं. बिमल अग्रवाल यांच्या कंपनीने हे जॅकेट पुरवलं होतं. याच बिमल अग्रवाल यांच्याशी श्रीधर पाटणकरांचे व्यावसायिक संबंध असून पाटणकर हे उद्धव ठाकरेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि परिवाराचे व्यावसायिक संबंध असलेल्यांनी हेमंत करकरेंची हत्या केल्याचा गंभीर आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.

कोण आहेत बिमल अग्रवाल?

किरीट सोमय्या यांनी पुण्यातील पत्रकार परिषदेत आरोप करताना सांगितले, ‘ उद्धव ठाकरे आणि परिवाराचे व्यावसायिक संबंध ज्यांनी हेमंत करकरेंची हत्या केली. हत्या कसाबचे सहकारी पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी केली. मात्र या चकमकीच्या वेळी करकरेंनी घातलेलं बुलेटप्रुफ जॅकेट बोगस होतं. नकली होतं. ते जॅकेट बिमल अग्रवाल यांच्या कंपनीने पुरवलेलं होतं. त्यांची चौकशी झाली. समित्या नेमल्या. बिमल अग्रवाल यांना अटक झाली. अशा तीन केसेसमध्ये बिमल अग्रवाल यांची चौकशी, अटक होऊन ते जामीनावर सुटलेले आहेत, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

उद्धव ठाकरेंच्या ‘राइट हँड’शी बिमल अग्रवालांची पार्टनरशिप

शिवसेनेचे यशवंत जाधव हे उद्धव ठाकरेंचा राइट हँड समजले जातात. हे मुंबई महापालिकेचे पाच वर्ष स्थायी समितीचा अध्यक्ष असून त्यांनी एक हजार कोटींच्या आसपास माया जमवली असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. ते म्हणाले, ‘ बिमल अग्रवाल आणि यतीन यशवंत जाधव यांची रजिस्टर्ड पार्टनरशिप कंपनी आहे. समर्थ इरेक्टर्स अँड डेव्हलपर्स. याच कंपनीने आत्ता मलबार हिलमध्ये 80 कोटी रुपयांचा प्रोजेक्ट विकत घेतला. यतीन हा यशवंत जाधवांचा मुलगा आहे. मुंबई महापालिकेच्या एका सर्टिफिकेटनुसार, समर्थ इरेक्टर्सकडून श्रीधर पाटणकर यांनी टीडीआर विकत घेतला आहे. म्हणजेच बिमल अग्रवाल यांच्याकडून.. बोगस बुलेटप्रुफ जॅकेट देणाऱ्याकडून श्रीधर पाटणकरांनी टीडीआर विकत घेतला आहे, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला.

हे सुद्धा वाचा

मुश्रीफांची बेनामी संपत्तीही जप्तीची कारवाई सुरु

दरम्यान, किरीट सोमय्या यांनी हसन मुश्रीफांच्या बेनामी संपत्तीच्या घोटळ्याबद्दलही सविस्तर सांगितलं. ते म्हणाले, ‘ बेनामी प्रॉपर्टी संबंधी हसन मुश्रीफांवर कारवाई सुरु आहे. 158 कोटी रुपयांचं मनी लाँड्रिंग केलं. रजत कंझ्युमर सर्व्हिसेस मरू भूमी फायनान्स अँड डेव्हलपमेंट, नवरत्न असोसिएट, माउंड कॅपिटल प्रायव्हेट लि., या कंपन्यांत 158 कोटींचा मनी लाँड्रिंग झालं आहे. आयकर विभागानं 90 कोटी रुपयांची बेनामी प्रॉपर्टी विकत घेतल्यामुळे कारवाई सुरु केली आहे. दोन कंपन्यांना आयकर विभागानं नोटीस दिली. ती मुदत संपली असून आता ती प्रॉपर्टी बेनामी घोषित केली असून जप्तीची कारवाई केली जात आहे.’

पवार मुश्रीफांना जाब का नाही विचारत?

हसन मुश्रीफ यांच्या सरसेनापती साखर कारखान्यातील गैर व्यवहाराचे आरोप करताना किरीट सोमय्या म्हणाले, ‘ पवार साहेब, तुम्ही शेतकरी आहात. मग हसन मुश्रीफला हा प्रश्न का नाही विचारत? सरसेनापती शुगर फॅक्टरीत शेतकऱ्यांशी खोटं बोलून 40 हजार शेतकऱ्यांकडून हसन मुश्रीफांच्या नातेवाईकांच्या कंपनीत 16 कोटी 31 लाख 93 हजार 500 रुपये जमा केले. ही बिल्डर डेव्हलपर कंपनी असून सरसेनापती साखर कारखान्यात हा गैरव्यवहार झाला… कोणत्याही कंपनीला 20 पेक्षा जास्त लोकांकडून पैसे जमवायचे असतील तर सेबीची परवानगी घ्यावी लागते. हे शेतकऱ्यांचे पैसे आहेत की शेतकऱ्यांच्या नावाने नेक्सजन कंपनीत जमा केलेत. याचे ऑडिट सुरु आहे, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

‘अनिल परबांचं काऊड डाऊन सुरू…’

राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील दोन रिसॉर्टवरही कारवाई सुरु असल्याचं किरीट सोमय्या यांनी सांगितलं. ते म्हणाले, ‘ अनिल परबचं काऊंट डाऊन सुरु झालं आहे. अनिल परबवरील कारवाईची उलटी गिनती सुरु झाली आहे. पर्यावरण मंत्रालयाने 31 जाने 2022 ला अनिल परब यांच्या दापोलीतील रिसॉर्ट पाडण्याचे आदेश दिले होते. केंद्र सरकारच्या पर्यावरण मंत्रालयाने महाराष्ट्र सरकारला नोटीस दिली आहे. 90 दिवसात अनिल परबांनी हे रिसॉर्ट पाडलं नाही. त्यामुळे मी रत्नागिरी जिल्हाधिकारी, महावितरण आदींना विनंती केली आहे की, परबांच्या दोन्ही रिसॉर्टचे वीज-पाणी कट करावी. 25 कोटींचा रिसॉर्ट आहे. प्रॉपर्टी टॅक्स तर दाखवला आहे. पण बांधकाम खर्च शून्य आहे. या प्रकरणी मनी लाँड्रिंग अंतर्गत तपास सुरु झाला आहे, असं किरीट सोमय्यांनी सांगितलं.