राणा पाटलांना उमेदवारी, सुभाष देशमुखांचा मुलगा नाराज, शक्ती प्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा

| Updated on: Oct 02, 2019 | 6:12 PM

विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडत असतानाचा उमेदवारी कुणाला मिळणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु आहे.

राणा पाटलांना उमेदवारी, सुभाष देशमुखांचा मुलगा नाराज, शक्ती प्रदर्शनासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा
Follow us on

उस्मानाबाद : विधानसभा निवडणुकीचा (Maharashtra Assembly Election) धुराळा उडत असतानाचा उमेदवारी कुणाला मिळणार यावरुन चांगलच रणकंदन सुरु आहे. उस्मानाबादमध्ये तुळजापूर येथून राणा जगजितसिंह पाटील (Rana Jagjit Singh join BJP) यांना उमेदवारी दिल्याने देशमुख गटात नाराजीचं वातावरण आहे. या उमेदवारीनंतर सहकारमंत्री सुभाष देशमुख (Subhash Deshmukh) यांचे नाराज पुत्र रोहन देशमुख (Rohan Deshmukh) यांनी कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. रोहन देशमुख मागील 2 वर्षांपासून तुळजापूर मतदारसंघासाठी इच्छुक होते. मात्र, ऐनवेळी त्यांना डावललं गेल्यानं रोहन देशमुख नाराज आहेत.

उमेदवारी नाकारल्यानंतर रोहन देशमुख यांनी शक्तीप्रदर्शन करत कार्यकर्त्यांचा मेळावा बोलावला आहे. “मी येत आहे, तुमचं ऐकून घेण्यासाठी. माझी माणसं, माझी ताकत” अशा टॅगलाईन देत कार्यकर्त्यांना भावनिक आवाहन करण्यात आलं आहे. 4 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजता तुळजापुरात हा कार्यकर्ता मेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यामुळे आता रोहन देशमुख काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

रोहन देशमुख यांनी यापूर्वी 2014 च्या लोकसभा निवडणुकीत बंडखोरी केली होती. त्या निवडणुकीत पराभव झाल्यानंतर ते पुन्हा भाजपमध्ये गेले होते. मात्र आता त्यांना विधानसभेत डावलण्यात आलं आहे.

राणा पाटील यांच्या विरोधात नाराजी 

राणा पाटील यांना पालकमंत्री पदाची स्वप्ने पडत असल्याचाही आरोप होत आहे. त्यांच्या भाजप प्रवेशानंतर स्थानिक भाजप कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. राणा पाटील भाजपमध्ये गेले असले, तरी त्यांच्या एकही बॅनरवर भाजपच्या लोकप्रतिनिधी आणि स्थानिक नेत्यांचा फोटो नसतो, अशीही तक्रार केली जात आहे. राष्ट्रवादीत मालक बनून राहायची सवय असलेल्या राणांनी भाजपच्या नेत्यांकडे दुर्लक्ष केल्याने पदाधिकारीही नाराज आहेत. राणा पाटील हे तुळजापूर मतदारसंघासाठी नवखे असून परका उमेदवार आणि दलबदलूपणाचा शिक्का असल्याने मतदार त्यांना स्वीकारतील का? हे येणाऱ्या काळातच स्पष्ट होणार आहे.

तुळजापूर विधानसभा – (Tuljapur Vidhan Sabha)

तुळजापूर मतदार संघावर सुरुवातीपासून काँग्रेसचं वर्चस्व राहिलं आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री मधुकरराव चव्हाण हे विद्यमान आमदार आहेत, मधुकरराव चव्हाण या मतदारसंघातून 5 वेळेस आमदार असून 2019 च्या निवडणुकीत विजयाचा षटकार मारणार का हे पाहावे लागेल. धोतर कुर्ता असा पेहराव असलेले जे विधिमंडळातील बुजुर्ग आमदार. 2014 च्या निवडणुकीत आमदार चव्हाण यांना 70,701 मते पडली तर राष्ट्रवादीचे जीवनराव गोरे यांना 41,091 मते पडली. त्यामुळे चव्हाण 29,610 मतांनी निवडून आले.

85 वय असतानाही एखाद्या तरुणाला लाजवेल अशा जिद्दीने ते मतदारसंघात संपर्क साधतात. जनतेची थेट संपर्क आणि कामे करणे ही त्यांच्या जमेची बाजू असली तरी तुळजाभवानी तीर्थ क्षेत्राचा म्हणावा तितका न झालेला विकासासह बंद पडलेले साखर कारखाने, सूत मील यामुळे त्यांच्यावर टीकाही होते. तरुण आमदार हवा असे विरोधक प्रत्येक निवडणुकीत म्हणतात. मात्र त्यांना अद्याप यश आलेले नाही. आमदार चव्हाण माजी मंत्री होते मात्र त्यांच्या काळात मोठे उद्योग, व्यवसाय आले नाहीत. तुळजापूर शहर आणि नळदुर्ग किल्ला परिसरात पर्यटन विकासाची कामे मधुकरराव चव्हाण यांच्या काळात मार्गी लागली.