निराशा..! 32 वर्षानंतर भारतीय पुरूष हॉकी संघासोबत तेच घडलं, वर्ल्डकप स्पर्धेत इंग्लंडविरुद्ध या चुका नडल्या
हॉकी वर्ल्डकप 2026 स्पर्धेत भारताने विजयी सलामी दिली होती. पण दुसऱ्या डावात भारतीय संघाला 32 वर्षांपासून सुरू असलेली पराभवाची मालिका काही मोडता आली नाही. इंग्लंडकडून 2-4 ने पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या सामन्यात भारताने काही चुका केल्या आणि त्याच नडल्या.

हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत भारताने विजयाने सुरूवात केली होती. पहिल्याच सामन्यात वेल्सचा 3-1 ने पराभव केला होता. पण दुसऱ्या सामन्यात विजयाचा रंग उडून गेला. कारण या स्पर्धेत कायम डोकेदुखी ठरलेल्या इंग्लंड संघाने भारताचा 2-4 ने धुव्वा उडवला. भारताने या सामन्यात खरं तर पहिल्या हाफपर्यंत 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमधील तिसऱ्या आणि चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारताची घसरण झाली. इंग्लंडने दणादण तीन गोल मारले आणि 2 गोलची आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली आणि भारताला पराभवाचं तोंड पाहावं लागलं. या पराभवामुळे 32 वर्षानंतर इंग्लंडला हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत पराभूत करण्याची आलेली संधी हुकली. भारताने इंग्लंडला 1994 मध्ये शेवटचं हॉकी वर्ल्डकप स्पर्धेत नमवलं होतं. तेव्हापासून आतापर्यंत भारतीय संघ पराभवाचं तोंड पाहात आहे.
भारत इंग्लंड सामन्याच्या पहिल्या हाफच्या पहिल्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने गोल मारत आघाडी घेतली होती. इंग्लंडकडून निकोलस बंडुरॅकने 14 व्या मिनिटाला गोल केला. त्यामुळे पहिल्या क्वॉर्टरमध्ये 0-1 अशी स्थिती होती. पण त्यानंतर भारताने दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये आक्रमक सुरूवात केली आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग आणि दिलप्रीत सिंग यांनी प्रत्येकी एक गोल केला. 17 व्या मिनिटाला हरमनप्रीत सिंगने गोल मारला आणि त्यानंतर 25 व्या मिनिटाला दिलप्रीत सिंगने गोल मारत 2-1 ने आघाडी घेतली.
दुसऱ्या हाफच्या तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये इंग्लंडने आक्रमक खेळ दाखवला आणि भारताला मागे टाकलं. 39 व्या मिनिटाला स्टूअर्ट रशमियरने गोल मारला आणि बरोबरी साधली. त्यानंतर हेन्री क्रॉफ्टने 43 व्या मिनिटला गोल करत आघाडी घेतली. त्यामुळे भारतावर दडपण वाढलं. दुसऱ्या हाफच्या चौथ्या क्वॉर्टरमध्ये भारत बरोबरी साधण्यासाठी धडपड करत होता. पण 55व्या मिनिटाला निकोलस बंडुरॅकने आणखी गोल मारत 2 गोलची आघाडी घेतली. ही आघाडी शेवटपर्यंत कायम राहिली.
भारतीय संघाचं काय चुकलं?
- इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात भारताने पहिल्या हाफपर्यंत 2-1 ने आघाडी घेतली होती. पण दुसऱ्या हाफमध्ये डिफेन्स कमकुवत ठरला. त्याचा फायदा इंग्लंडने घेतला आणि तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये चार मिनिटात दणादण दोन गोल मारेल. 39 व्या आणि 43 व्या मिनिटाला गोल मारले.
- या सामन्यात भारतीय खेळाडूंना कार्ड मिळाल्याचा फटका बसला. सुमितला ग्रीन आणि निलकांत सिंगला यलो कार्ड मिळालं. त्यामुळे भारतीय संघ काही काळ 10 खेळाडूंसह खेळत होता. त्यामुळे इंग्लंडला आक्रमण करण्याची संधी मिळाली.
- इंग्लंडला मिळालेल्या पेनल्टी कॉर्नर रोखण्यास भारतीय संघाचा डिफेन्स पूर्णपणे अपयशी ठरला. 55 व्या मिनिटाला निकोलस बंडुरॅकने पेनल्टी कॉर्नरवर थेट गोल करत भारताच्या बरोबरीच्या आशा संपुष्टात आणल्या.
- भारताने या सामन्यात मोक्याच्या क्षणी रिव्ह्यू गमावले. भारीतय संघ चौथ्या क्वॉर्टरमध्ये पिछाडीवर पडला होता. तेव्हा भारताने एक महत्त्वाचा व्हिडीओ रिव्ह्यू गमावला. त्यामुळे सामन्याच्या शेवटच्या क्षणात पंचांचा निर्णयाला आव्हान देण्याची संधीच नव्हती.
