गॉल कसोटी सामन्यात भारताचा विजय निश्चित! दुसऱ्या डावात इतक्या धावा केल्या तरी बस्स
भारत आणि श्रीलंका कसोटी सामन्यात दोन दिवसांचा खेळ शिल्लक आहे. पहिल्या डावात भारताने 178 धावांची आघाडी घेतली असून चौथ्या दिवशी फलंदाजीला उतरणार आहे. त्यामुळे किती धावांचं लक्ष्य ठेवलं की विजय पक्का होईल? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे.

India vs Sri Lanka: भारत श्रीलंका पहिला कसोटी सामना निर्णायक वळणावर आला आहे. भारताने पहिल्या डावात 462 धावांची खेळी केली होती. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी श्रीलंकेला 284 धावांवर गुंडाळलं. त्यामुळे तिसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताची सरशी होती. आता उर्वरित दोन दिवसात कसा खेळ होतो याकडे क्रीडाप्रेमींचं लक्ष लागून आहे. दोन दिवसात 180 षटकांचा खेळ असून भारताने पहिल्या डावात 178 धावांची आघाडी घेतली आहे. त्यामुळे दुसऱ्या डावात भारतीय संघ फलंदाजीला उतरल्यानंतर किती धावांचं लक्ष्य श्रीलंकेसाठी पुरेसे असतील? असा प्रश्न क्रीडाप्रेमींना पडला आहे. गॉलमध्ये चौथ्या डावात किती धावांचं लक्ष्य यशस्वीरित्या गाठलं गेलं आहे? या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या बातमीत मिळतील.
गॉल कसोटीच्या दुसऱ्या डावात भारतीय संगाला किमान 250 धावा करणं भाग आहे. कारण भारताने 400 धावांच्या आसपास श्रीलंकेसमोर लक्ष्य ठेवलं तर विजयाचं गणित सुटू शकतं. पण या 250 धावा करणं दुसऱ्या डावात वाटतं तितकं सोपं नाही. पण भारताला हे गणित सोडवावं लागणार आहे. कारण पहिल्या डावात फिरकीची जादू चालली. पहिले दोन दिवस खेळपट्टी फलंदाजीला मदत करणारी होती. आता तसं नाही. त्यामुळे भारतीय फलंदाजांची कसोटी लागणार आहे. गॉलमध्ये दुसऱ्या डावात सर्वात मोठा स्कोअर 2022 मध्ये पाकिस्तानने गाठला होता. या सामन्यात पाकिस्तानने 342 धावांचं लक्ष्य गाठलं होतं. तेव्हा अब्दुल्लाह शफीकच्या शतकाच्या जोरावर हे शक्य झालं होतं. तर श्रीलंकेचं बोलायचं तर 2019 मध्ये या मैदानात न्यूझीलंडविरुद्ध 268 धावा गाठून विजय मिळवला होता.
गॉलच्या मैदानात धावांच्या हिशेबाने भारताने सर्वात मोठा विजय मिळवला आहे. 2017 मध्ये गॉल आंतरराष्ट्रीय मैदानात टीम इंडियाने श्रीलंकेविरुद्ध 304 धावांनी विजय मिळवला होता. तेव्हा भारताने पहिल्या डावात 600 धावांचा डोंगर रचला होता. तेव्हा श्रीलंकेने पहिल्या डावात 291 धावा केल्या. भारताला पहिल्या डावात 309 धावांची आघाडी मिळाली होती. दुसऱ्या डावात पुन्हा भारताने 240 धावा केल्या आणि डाव घोषित केला. याह 549 धावांचं आव्हान दिलं. पण श्रीलंकेचा खेळ 245 धावांवर आटोपला आणि भारताने 304 धावांनी विजय मिळवला होता.
