‘सरकारचं अती होतंय!,हा तर रडीचा डाव’, आव्हाडांवरील आरोपांवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया

जितेंद्र आव्हाड यांच्यावरील विनयभंगाच्या आरोपांवर रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

सरकारचं अती होतंय!,हा तर रडीचा डाव, आव्हाडांवरील आरोपांवर रोहित पवार यांची प्रतिक्रिया
| Edited By: | Updated on: Nov 14, 2022 | 12:46 PM

मुंबई : राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad News) यांच्यावर विनयभंगाचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी त्यांच्यावर गुन्हाही दाखल करण्यात आली आहे. यावर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. “सरकारचं आता अती होतंय! एकदा प्रयत्न करून बघितला पण सत्याचा आवाज दाबता येत नाही म्हणून दुसऱ्या गुन्ह्यात गोवणं हा रडीचा डाव आहे! तक्रारदाराची राजकिय पार्श्वभूमी आणि तो व्हिडिओ बघितला तर कोणतीही महिला भगिनी सांगेन की, सत्य काय आहे?”, असं रोहित पवार (Rohit Pawar) यांनी म्हटलं आहे.

‘छोटे मन से कोई बड़ा नहीं होता, टूटे मन से कोई खड़ा नहीं होता’, स्व. अटलजींच्या या ओळी सत्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करणारे नक्कीच लक्षात घेतील, असं रोहित पवार म्हणालेत.

ज्या कार्यक्रमातील ही घटना आहे, तिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अनेक नेत्यांचा कार्यक्रम होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होती. तुम्ही कुठल्याही सर्वसामान्य महिलेला विचारा, त्या व्हिडिओमध्ये काही चुकीचं वाटतंय का? छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवणारा पिक्चर थांबवल्यामुळे कारवाई झाली होती. त्यावेळी जास्त दिवस जेलमध्ये ठेवता आलं नाही, म्हणून अजून कुठेतरी विषय काढायचा तर या गोष्टी चुकीच्या आहे.संविधानाच्या विरोधात आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातोय, असं रोहित पवार म्हणाले.

छोट्या मनाने अशा पद्धतीच्या कारवाई केल्या जातात. अशा कारवाया असेल तर त्याला विरोध केलाच पाहिजे. केंद्रीय यंत्रांचा वापर करून अनेकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. तर राज्य सरकार पोलिसांचा वापर करून नेत्याची बदनामी करत असेल तर याचा निषेध केला पाहिजे, असंही रोहित म्हणालेत.