महाराष्ट्रात मर्दानगीचा दुष्काळ, खोके सरकारमध्ये जीव नाही, शिंदे सरकारवर कुणाची आगपाखड!

| Updated on: Nov 25, 2022 | 9:17 AM

बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, अशी शंकाही उपस्थित करण्यात आली आहे.

महाराष्ट्रात मर्दानगीचा दुष्काळ, खोके सरकारमध्ये जीव नाही, शिंदे सरकारवर कुणाची आगपाखड!
Image Credit source: social media
Follow us on

मुंबईः महाराष्ट्राच्या (Maharashtra) अस्मितेचा घोर अपमान होत असताना खोके गटाचा एकही स्वाभिमानी आमदार उसळून उठलेला दिसत नाही. बेळगावात सुरु असलेल्या मराठी बांधवांवरील अत्याचाराविरोधात महाराष्ट्रातील एकाही भाजप पुढाऱ्याचा धिक्कार केला नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी (Karnataka CM) सांगलीतील जत, सोलापुरात (Solapur) अक्कलकोटवर दावा सांगितला आहे.

खोके सरकारात जीव नाही की मनगटात सळसळ नाही, अशी घणाघाती टीका शिवसेनेचे मुखपत्र सामनातून करण्यात आली आहे. अशा मिंध्यांचे सरकार लाथ मारून घालवावेच लागेल, त्यातच सगळ्यांचे हित आहे, असा इशाराही अग्रलेखातून देण्यात आला आहे.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरून भाजपच्या मवाळ धोरणावर सामनातून टीका करण्यात आली आहे. तसेच कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी महाराष्ट्रातील काही गावांवर केलेल्या दाव्यांवर सरकार अद्याप शांत का आहे, असा सवाल सामनातून विचारण्यात आला आहे.
बाजूचे गुजरात राज्य महाराष्ट्रातून उद्योग-व्यवसाय पळवत आहे तर कर्नाटकसारखे राज्य महाराष्ट्राचा भूभाग घशात घालण्याची भाषा करीत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री या सर्व मुद्द्यांवर गप्प आहेत. सरकार वाचवण्यासाठी ज्योतिष दरबारी बसले आहेत, असा टोमणाही लगावण्यात आलाय. एकनाथ शिंदे बुधवारी शिर्डी दौऱ्यावर असताना नाशिक जिल्ह्यातील सिन्नर येथे एका मंदिरात त्यांनी ज्योतिष्याला हात दाखवण्याची चर्चा रंगली आहे. हाच मुद्दा पकडत सामनातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना घेरण्यात आलंय.

कर्नाटक सीमा प्रश्नावरून भाजपच्या भूमिकेवरही अग्रलेखातून शंका उपस्थित करण्यात आली आहे. बेळगाव कारवारसह संपूर्ण सीमा भाग महाराष्ट्रात यावा, असे महाराष्ट्र भाजपाला खरेच वाटत आहे का, ही शंकाच आहे. सीमाभागातील तरुणांना महाराष्ट्रातील विद्यापीठात राखीव जागा ठेवण्याचा निर्णय हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घेतला होता. तसा त्याग इतर कोणत्याही राजकीय पक्षाने केला नसल्याचेही सामनाच्या अग्रलेखातून दर्शवण्यात आले आहे.