‘संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका’

| Updated on: Jun 11, 2021 | 1:09 PM

मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. | Maratha Morcha

संभाजीराजेंनी मोर्चा काढण्यात चालढकल केली तर मराठा समाजाचं नुकसान, सरकारला पळवाट देऊ नका
चंद्रकांत पाटील आणि संभाजीराजे छत्रपती
Follow us on

कोल्हापूर: संभाजीराजे छत्रपती मराठा मोर्चा काढण्यात चालढकल करत असतील तर ती गोष्ट ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. मात्र, यामुळे मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. संभाजीराजे यांनी चालढकल केली तर भाजप जो कोणी मराठा आरक्षणाच्या लढाईसाठी पुढाकार घेईल, त्याच्या पाठिशी उभा राहील, असेही चंद्रकांत पाटील यांनी म्हटले. (BJP leader Chandrakant Patil on Maratha Morcha agitation)

ते शुक्रवारी कोल्हापुरात प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी चंद्रकांत पाटील यांना संभाजीराजे राज्य सरकारला वेळ देत आहेत का, असा प्रश्न विचारण्यात आला. त्यावर चंद्रकांत पाटील यांनी म्हटले की, मराठा मोर्चा काढण्यात चालढकल झाली तर ती बाब ध्यानात येण्याइतपत मराठा समाज सुज्ञ आहे. त्यानंतर मराठा आंदोलनाचं नेतृत्व दुसऱ्या कोणाकडे जाईल किंवा काय होईल, ते माहिती नाही. मात्र, वेळ निघून गेल्यास मराठा समाजाचे मोठे नुकसान होईल. संभाजीराजे छत्रपती यांच्या भूमिकेमुळे सरकारला आरक्षणाच्या प्रश्नापासून पळवाट काढण्याची संधी तर मिळणार नाही ना, याचा विचार संभाजीराजे यांनी केला पाहिजे.

संभाजीराजे एकदा मोर्चा काढणार, एकदा लाँग मार्च काढणार असे सांगतात. कोल्हापुरातही 16 जूनला मराठा मोर्चा निघणार का, याची अद्याप शाश्वती नाही. तुम्ही या सर्व गोष्टी मराठा समाजासमोर नीटपणे मांडल्या पाहिजेत, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
संभाजीराजे यांनी रायगडावरुन मराठा मोर्चा काढण्याची घोषणा केल्यानंतर दुसऱ्या मिनिटाला मी त्यांना पाठिंबा जाहीर केला. आता त्यांनी माघार घेतली तरी भाजपच्या भूमिकेत फरक पडणार नाही. पण उद्या कोल्हापुरात दुसऱ्या कोणी पुढाकार घेऊन मोर्चा काढला तर भाजप त्यांनाही पाठिंबा देईल, असे चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केले.

‘पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे’

महाविकासआघाडी सरकार धार्मिक गोष्टींना विरोध करते बाकी सगळ्याला परवानगी देते. शरद पवार यांनाही आजारपणाच्या काळात हॉटेल मालकांची काळजी होती. मात्र, आषाढीच्या पायी वारीसाठी वारकऱ्यांना परवानगी मिळालीच पाहिजे, अशी मागणीही चंद्रकांत पाटील यांनी केली.

‘शरद पवार- प्रशांत किशोर भेटीवर भाष्य टाळले’

प्रशांत किशोर शरद पवार यांना नेमके का भेटायला गेले आहेत, याची मला बिलकूल कल्पना नाही. त्यामुळे मी यावर काही बोलणे योग्य ठरणार नाही, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.

संबंधित बातम्या:

पंतप्रधान मोदींना वाटतं मराठा आरक्षण राज्याचा विषय, त्यामुळे संभाजीराजेंना भेटले नाहीत: चंद्रकांत पाटील

(BJP leader Chandrakant Patil on Maratha Morcha agitation)