Sanjay Raut Vs MNS : कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवा; अयोध्या वारीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

| Updated on: Apr 30, 2022 | 11:20 AM

कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवावे. ज्या राज्यात चालला आहात, त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ या नेत्याविषयी आपल्याच नेत्याची वक्तव्ये पाहा. तोंड उघडायला भाग पाडू नका, असे संजय राऊत मनसेवर टीका करताना म्हणाले.

Sanjay Raut Vs MNS : कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवा; अयोध्या वारीवरून संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
मनसे, भाजपावर टीका करताना संजय राऊत
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : ज्यांनी हिंदुत्वाचे (Hindutwa) कातडे पांघरले आहे, हे कातडेही भाड्याचे आहे, अशी घणाघाती टीका शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मनसे आणि राज ठाकरे यांच्यावर केली आहे. 1992ची दंगल विसरलात का, ज्यामध्ये शिवसैनिकांनी बलिदान केले. अयोध्येच्या आंदोलनात शिवसेनेने केलेला त्याग ते विसरले का, आम्हाला हिंदुत्व भाड्याने घ्यावे लागत नाही, ते आमच्या रक्तात आहे. आम्ही कोणालाही वापरू देत नाही. आमचा वापर होत आहे, असे वाटते त्यावेळी लाथ मारून स्वाभिमानाने बाहेर पडणारे शिवसैनिक आहोत. हिंदुत्वाचा अपमान होत आहे, हे लक्षात आल्यावर शिवसेना (Shivsena) युतीतून बाहेर पडली. त्यामुळे आम्हाला कोणीही हिंदुत्व शिकवू नये, तुम्ही अडचणीत याल, असा टोला त्यांनी भाजपाला लगावला आहे. राजद्रोहाच्या गुन्ह्यावरून संजय राऊत यांनी यावेळी नरेंद्र मोदी आणि भाजपावर निशाणा साधला.

‘योगी आदित्यनाथांवर त्यांनीच केली होती टीका’

कुणाच्या वाढदिवसाला आपण भैया नावाचा केक कापला, हे जरा आठवावे. ज्या राज्यात चालला आहात, त्या राज्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ या नेत्याविषयी आपल्याच नेत्याची वक्तव्ये पाहा. तोंड उघडायला भाग पाडू नका, असे संजय राऊत म्हणाले. ज्यांनी योगींना टकला म्हणून हिणवले, त्यांच्या भगव्या कपड्यांवरून नावे ठेवली त्यांनी शिकवू नये, अशी टीका त्यांनी केली. अचानक हिंदुत्ववादी झाले, असा टोलाही त्यांनी मनसेला लगावला.

‘आमची शस्त्रे धारदार’

आम्ही दुसऱ्याच्या खांद्यावरून बंदुक चालवत नाहीत. आमची शस्त्रे आहेत. ही शस्त्रे धारदार आहेत. हनुमान चालिसाच्या नावावर दंगली घडवून देशाचे विभाजन करण्याचा डाव असल्याचा आरोप त्यांनी केला. अश्विनीकुमार चौबे यांनी आपले मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे हनुमानाविषयीचे वक्तव्य आठवावे, त्यांनी शिवसेनेची, बाळासाहेब ठाकरेंची चिंता करू नये. तुम्ही बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेशी काय गद्दारी केली, हे बाळासाहेब ठाकरेंनाही पटले नसते, अशी आठवण त्यांनी करून दिली. हनुमान चालिसावरून राजकारण करून महाराष्ट्राला बदनाम करू नका, असेही चौबेंना संजय राऊत म्हणाले.

राज ठाकरे, भाजपावर टीका करताना काय म्हणाले संजय राऊत?