मुंबई : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शपथविधी झाला. यानंतर 12 मंत्र्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, खाते वाटप जाहीर करण्यास विलंब झाला. यानंतर आता चर्चा रंगलेय ती दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्ताराची. दिवाळीनंतर शिंदे-फडणवीस सरकारचा दुसरा मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे.
राज्याच्या मंत्रिमंडळ विस्ताराला दिवाळीचा मुहूर्त असल्याचे संकेत ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. धुळे जिल्ह्यातील शिरपूर येथे नागरिक सत्काराला आले असतांना माध्यमांशी बोलत होते.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळेल अशी बच्चू कडूंना आशा आहे. जाहीर पणे अनकेदा त्यांनी मंत्री मंडळात स्थान न मिळाल्याची नाराजी बोलून दाखवली होती.
दुसऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात दुसरे नाव चर्चेत आहे ते संजय शिरसाट यांचे. सांगोल्याचे आमदार शहाजी बापू पाटील देखील मंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची चर्चा आहे.
दरम्यान, मंत्री पदावरुन शिंदे गटातील धुसफूस अजूनही सुरूच आहे. चांगल्या खात्याचा थोडा आग्रह धरला असता तर चांगलं मंत्रिपद मिळालं असतं, असं विधान गुलाबराव पाटील यांनी केले आहे.
पहिल्या मंत्री मंडळ विस्तारात काहींना जुनीच खाती देण्यात आली आहे. म्हणजे महाविकास आघाडी सरकारमध्ये सत्तेत असताना या मंत्र्यांकडे जी खाती होती तीच त्यांना देण्यात आली. तर काहींना नवीन खाती देण्यात आली आहेत.