नवी मुंबई | 27 नोव्हेंबर 2023 : 2019 ला विधानसभा विधानसभा निवडणूक होत होती. साताऱ्यात पोट निवडणूक लागली होती अन् राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार साताऱ्यात भर पावसात भाषण देत होते. तो दिवस तुम्हाला आठवतो का? शरद पवार यांनी भर पावसात भाषण दिलं अन् सातारकरांनी राष्ट्रवादीच्या पारड्यात भरभरून मतं टाकली. राष्ट्रवादीचा विजय झाला. तेव्हा शरद पवार यांच्या या पावसातल्या सभेची प्रचंड चर्चा झाली. आता पुन्हा एकदा या प्रसंगाची पुनरावृत्ती झालीय. नवी मुंबईत शरद पवार सभेला संबोधित करणार होते. पण इतक्यात पावसाने हजेरी लावली मग काय… भर पावसात शरद पवार पुन्हा एकदा ‘बरसले’… शरद पवार यांच्या सभेनंतर अनेकांना साताऱ्यातील सभेची आठवण झाली.
नवी मुंबईच्या बामणदेव झोटिंगदेव मैदानावर राष्ट्रवादीच्या वतीने आयोजित कार्यकर्ता मेळावा आणि महिला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता. तेव्हा शरद पवार यांनी संबोधित केलं. यावेळी कार्यकर्त्यांना उमेद भरण्यासाठी त्यांनी प्रोत्साहित केलं. तर बचत गटाच्या महिलांना संघर्ष करण्याचा कानमंत्र त्यांनी दिला. निराशा हा विषय आपल्या मनामध्ये कधी येता कामा नये. त्या निराशेवर मात करून संघर्ष करू. धैर्यानं पुढे जाऊ. हाच कार्यक्रम राबवायचा निर्धार आजच्या दिवशी आपण करूया, असं म्हणत शरद पवार यांनी उपस्थितांना संबोधित केलं. पावसात सुरु असलेलं हे भाषण लोक खुर्च्या डोक्यावर घेत ऐकत होते.
नवी मुंबईतील सभेत शरद पवार यांनी संबोधित केलं. तेव्हा न खचता धैर्याने संकटांना सामोरं जाण्याचा सल्ला शरद पवार यांनी दिला. शरद पवार यांच्यासोबत राष्ट्रवादीचे नेते आणि कार्यकर्ते मंचावर उपस्थित होते. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष मेहबूब शेख यांच्यासह नवी मुंबईतील राष्ट्रवादीचे अन्य नेतेमंडळी स्टेजवर होते. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या अध्यक्षा सक्षणा सलगर यांनी माईक हातात घेत हिंदुस्तानचा बुलंद आवाज, शरद पवार, शरद पवार अशी घोषणाबाजी केली. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीच्या विजयाचा विश्वास व्यक्त केला.
शरद पवार यांची एक सभा म्हणजे विजयाची हमी, असं त्यांचे समर्थक गॅरेंटीने सांगतात. उदयनराजे भोसले यांनी भाजप सोबत जाण्याचा निर्णय घेतला. अन् साताऱ्यात पोट निवडणूक लागली. या निवडणुकीत उदयनराजे यांच्या विरोधात शरद पवार यांचे जुने मित्र श्रीनिवास पाटील अशी लढत होत होती. उदयन राजे जिंकणार की श्रीनिवास पाटलांचा विजय होणार? अशी चर्चा साताऱ्यासह राज्यभरात होत होती. अशात शरद पवार मैदानात उतरले… शरद पवार यांच्या पावसातल्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली. या निवडणुकीत उदयनराजे यांचा पराभव झाला अन् श्रीनिवास पाटील जिंकले. कालच्या नवी मुंबईतील पावसातल्या सभेनंतर शरद पवार यांच्या या भाषणाने कुणाची विकेट जाणार अशी चर्चा होतेय.