राष्ट्रवादीच्या शिर्डीतील अधिवेशनानंतर शिंदे सरकार कोसळणार; राष्ट्रवादीच्या दोन बड्या नेत्यांचं भाकीत
राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
शिर्डी: राज्यातील शिंदे-फडणवीस यांचं सरकार स्थिर आहे का? असा सवाल वारंवार केला जात आहे. त्यावर सकारात्मक आणि नकारात्मक प्रतिक्रियाही व्यक्त केल्या जात आहेत. विरोधकांकडून वारंवार हे सरकार कोसळणार असल्याचा दावाही केला जात आहे. मात्र, हे सरकार कधी कोसळेल याची तारीख कुणीच सांगितलेली नाही. परंतु, आता राष्ट्रवादीच्या (ncp) दोन नेत्यांनी मोठा दावा केला आहे. एका नेत्याने तर येणारी कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीच्या (maha vikas aghadi) मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते होणार असल्याचा दावा केला आहे. तर दुसऱ्या नेत्याने तर शिर्डीतील (shirdi) अधिवेशनानंतर राज्यातील सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
शिर्डीत आजपासून राष्ट्रवादीचं दोन दिवसीय चिंतन शिबीर सुरू होत आहे. या शिबीराच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शिर्डीत आले होते. काल त्यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीच्या अधिवेशनानंतर राज्यातील शिंदे सरकार कोसळणार असल्याचं भाकीत केलं आहे.
काँग्रेसचं अधिवेशन झाल्यानंतर शिवसेना फुटली. हा आमच्या गावचा पायगुण आहे. आता राष्ट्रवादीचं अधिवेशन झाल्यावर राष्ट्रवादी फुटेल, असा दावा भाजपचे खासदार सुजय विखे पाटील यांनी केला होता. हाच धागा पकडत जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.
खासदारांनी आपल्याच गावाचा असा पायगुण स्वत:च जाहीर केल्याबद्दल त्यांचं कौतुक आहे. शिर्डीत एक अधिवेशन पार पडलं. अन् महाविकास आघाडी सरकार पडलं. आताही आमचं अधिवेशन झाल्यावरच सरकार पडेल. काँग्रेसचं अधिवेशन झालं. देवाला काय माहीत कुणाचं सरकार आहे. त्याने सरकार पाडलं. आता आमचं अधिवेशन झालं तर राज्यातील सरकार पडेल, असा दावा जयंत पाटील यांनी केला.
तसेच महाराष्ट्रात सर्वात भक्कम पक्ष राष्ट्रवादी आहे. भक्कम आहे. त्यामुळे राष्ट्रवादी फुटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
दरम्यान, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनीही प्रतिक्रिया व्यक्त केली. राज्यातील जनतेच्या मनात रोष आहे. आषाढी आणि कार्तिकीची पूजा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री करत असतात. येणाऱ्या कार्तिकीची महापूजा महाविकास आघाडीचे मुख्यमंत्रीच करतील, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.
देवेंद फडणवीस यांना उपमुख्यमंत्री म्हणून पूजा करावी लागली. भविष्यात त्यांना पूजा करता येणार नाही. फडणवीस हे भविष्यात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदीही दिसणार नाही. राष्ट्रवादी काँग्रेस हा राज्यातील मोठा पक्ष आहे. राष्ट्रवादीचा मुख्यमंत्रीच पूजा करेल, असा दावाही त्यांनी केला.