Shiv sena : मुख्यमंत्रीपद गेलंच, पण विरोधी पक्षनेतेपदही राहणार नाही; शिवसेनेच्या वाटचालीतील सर्वात मोठा बॅडपॅच

| Updated on: Jun 30, 2022 | 2:17 PM

Shiv sena : शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांसह बंड केलं. त्यात शिवसेनेचे 40 आमदार होते. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार राहिले. त्यामुळे शिवसेनेच्या विधीमंडळातील वर्चस्वालाच खिळ बसली आहे.

Shiv sena : मुख्यमंत्रीपद गेलंच, पण विरोधी पक्षनेतेपदही राहणार नाही; शिवसेनेच्या वाटचालीतील सर्वात मोठा बॅडपॅच
मुख्यमंत्रीपद गेलंच, पण विरोधी पक्षनेतेपदही राहणार नाही; शिवसेनेच्या वाटचालीतील सर्वात मोठा बॅडपॅच
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या बंडामुळे फक्त शिवसेनेत फूट पडलेली नाही तर शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचं सरकारही कोसळलं आहे. उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. त्यानंतर आता शिवसेनेकडे विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदही राहणार नाही. शिवसेनेकडे (shivsena) अवघे 16 आमदार आहेत. तर विधानसभेत राष्ट्रवादी हा सर्वात मोठा राजकीय पक्ष आहे. त्यामुळे राष्ट्रवादीकडे विरोधी पक्षनेतेपद जाणार आहे. नेहमीच सत्तेच्या केंद्रस्थानी राहिलेल्या शिवसेनेच्या वाटचालीतील हा सर्वात मोठा बॅडपॅच असल्याचं सांगितलं जात आहे. छगन भुजबळ, नारायण राणे आणि राज ठाकरे यांच्या बंडानंतरही शिवसेनेला एवढा मोठा फटका बसला नव्हता. त्यांच्या विधानसभेतील अस्तित्वाला नख लागलं नव्हतं. मात्र, यावेळी त्यांच्या विधानसभेतील अस्तित्वावरच प्रश्नचिन्हं निर्माण झालं आहे.

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी 51 आमदारांसह बंड केलं. त्यात शिवसेनेचे 40 आमदार होते. त्यामुळे शिवसेनेकडे केवळ 16 आमदार राहिले. त्यामुळे शिवसेनेच्या विधीमंडळातील वर्चस्वालाच खिळ बसली आहे. महाविकास आघाडीत शिवसेनेकडे 56, राष्ट्रवादीकडे 53 आणि काँग्रेसकडे 44 आमदार आहेत. शिवसेनेकडे केवळ तीन आमदार अधिक असतानाही काँग्रेस आणि राष्ट्रवादीने सर्वात मोठा पक्ष म्हणून शिवसेनेकडे मुख्यमंत्रीपद दिलं. शिवाय शिवसेनेला महत्त्वाची खातीही दिली होती. आता शिंदे याच्या बंडामुळे शिवसेनेकडे अवघे 16 आमदार उरले आहेत. तर राष्ट्रवादी हा आघाडीतील सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. त्यामुळे विधानसभा आणि विधान परिषदेतील नेतृत्व आपोआपच राष्ट्रवादीकडे जाणार आहे. तर, शिवसेनेला विधानसभेत तिय्यम भूमिकेत दिसणार आहे.

हे सुद्धा वाचा

शिंदे गटाचं ऐकावं लागेल?

विधानसभेत पहिल्यांदाच एक विचित्रं परिस्थिती निर्माण होणार आहे. शिंदे गट विधानसभेत शिवसेनेचा गट म्हणूनच नोंदणीकृत राहणार आहे. मात्र, हा गट सत्तेत असेल तर मूळ शिवसेना ही विरोधात बसणार आहे. शिंदे गटाच्या दाव्यानुसार, आमच्याकडे संख्याबळ अधिक आहे. त्यामुळे आमचीच शिवसेना खरी आहे. त्यामुळे ठाकरे यांच्याकडील आमदारांना आमचा व्हीप लागू होईल. त्यांना आमचं म्हणणं ऐकावं लागणार आहे. शिंदे गटाच्या या भूमिकेमुळे कायदेशीर पेच निर्माण होणार आहे. त्यातून शिवसेना काय मार्ग काढते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

शिवसेनेची वाटचाल

शिवसेनेने त्यांच्या वाटचालीत अनेक चढउतार पाहिले आहेत. शिवसेनेत अनेकदा बंड झालं. पहिलं बंड शिवसेनेचे पहिले महापौर हेमचंद्र गुप्ते यांनी बंड केलं. त्यानंतर बंडू शिंगरे यांनी बंड केलं. शिंगरे यांनी तर शिवसेना प्रमुखांच्या हयातीत शिवसेना स्थापन केली होती. त्यानंतर छनग भुजबळ, नारायण राणे, गणेश नाईक आणि राज ठाकरे यांनीही बंड केलं. पण या बंडाचा कोणताच परिणाम शिवसेनेवर झाला नाही. शिवसेना पुन्हा एकदा नव्या जोमाने उभी राहिली. या 56 वर्षाच्या काळात शिवसेनेने राज्याला मनोहर जोशी, नारायण राणे आणि उद्धव ठाकरे यांच्या रुपाने तीन मुख्यमंत्री दिले. शिवसेनेने विधानसभा आणि विधान परिषदेती विरोधी पक्षनेतेपदही लिलया सांभाळलं. शिवसेना नेहमीच राज्यातील राजकारणाच्या केंद्रस्थानी राहिली आहे. शिंदे यांचं बंड हे शिवसेनेसाठी मोठा बॅडपॅच आहे. त्यातून उद्धव ठाकरे कसा मार्ग काढतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.