पवारांनी 4 वेळा इशारा दिला, गृहखात्याने 5 वेळा अलर्ट केलं, पण ठाकरेंच्या दुर्लक्षामुळे सरकार पडलं? वाचा सविस्तर…
अलर्टनंतरच्या दुर्लक्षामुळे ठाकरे सरकार पडलं- सूत्र
मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी काल राजीनामा देत आपल्या मविआ सरकारसह आपल्या राजकीय कारकिर्दीची सांगता केली. त्याला मागच्या 9 दिवसांचा सत्ता संघर्ष जितका जबाबदार आहे तितकाच याआधी शिवसेनेत घडत असलेल्या घडामोडीही जबाबदार आहेत. काही नेत्यांच्या बंडाळीमुळे अख्ख्या सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं. पण या सगळ्याची महाविकास आघाडीतील नेत्यांना जराही कल्पना कशी नव्हती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची नस न् नस जाणून असणाऱ्या शरद पवारांनाही (Sharad Pawar) ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, अशी सध्या महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आहे. पण पक्षात होत असलेल्या हालचालींकडे उद्धव ठाकरे यांनी दुर्लक्ष केल्यानेच ठाकरे सरकार पडल्याचं बोललं जातंय. शरद पवारांनी 4 वेळा अलर्ट केलं, गृहखात्याने 5 वेळा इशारा दिला, पण ठाकरेंच्या दुर्लक्षामुळे सरकार पडलं असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
पक्षातल्या घडामोडींकडे दुर्लक्ष?
उद्धव ठाकरे यांच्याकडे राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी होती. शिवाय शिवसेना पक्षाच्या प्रमुखपदाचीही जबाबदारी आहे. पण पक्षांतर्गत बदलांकडे त्यांनी दुर्लक्ष केलं असल्याचं बोललं जात आहे.
पवारांकडून इशारा
काही नेत्यांच्या बंडाळीमुळे अख्ख्या सरकारचं अस्तित्व धोक्यात आलं. पण या सगळ्याची महाविकास आघाडीतील नेत्यांना जराही कल्पना कशी नव्हती आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची नस न् नस जाणून असणाऱ्या शरद पवारांनाही ही गोष्ट कशी लक्षात आली नाही, अशी सध्या महाराष्ट्रासह देशभरात चर्चेत आहे. तर या सगळ्याची पवारांना कल्पना होती. शिवाय त्यांनी याबाबत उद्धव ठाकरेंना इशाराही दिला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळते आहे.
गृहखात्याकडून 5 वेळा अलर्ट
एवढे आमदार बंड करतात. रातोरात हे आमदार महाराष्ट्र राज्य सोडून गुजरातकडे रवाना होतात. याची जराही कल्पना गृहखात्याला कशी आली नाही, गुप्तचर यंत्रणा यावेळी काय करत होती, असे प्रश्न चर्चे आले. पण गृहखात्याकडून देखील चार ते पाच वेळा माहिती देऊन देखील उद्धव ठाकरे यांच्याकडून हालचाल न झाल्याने सरकार पडलं, अशी माहिती सुत्रांनी दिली आहे.
जयंत पाटील काय म्हणाले?
जयंत पाटलांनी मात्र याच्या अगदी उलट प्रतिक्रिया दिली आहे. उद्धव ठाकरे राजीनामा देणारं आहेत, याबाबत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना माहिती नव्हतं. ज्यावेळी उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाईव्हच्या माध्यमातुन घोषणा केली त्यावेळी मला आणि शरद पवार यांना माहिती मिळाली. शरद पवार यांना याचं आश्चर्य वाटलं, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राजीनामा देण्यापूर्वी शरद पवार यांना त्याची माहिती दिली नव्हती आणि ती का दिली नव्हती? असा प्रश्न विचारला जातोय.