Shiv sena : राणेंनी खाल्लेल्या मिठाला जागावं, त्यांचा इतिहास रक्तरंजित, उद्धव ठाकरेंवरील जहरी टीकेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युतर

| Updated on: Jul 26, 2022 | 8:39 PM

शिवसेनेचे कोकणातील नेते वैभव नाईक यांनीही राणेंवर त्याच भाषेत जोरदार पलटवार केला आहे, त्यामुळे आता पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना हा सामना रंगताना पाहायला मिळतोय.

Shiv sena : राणेंनी खाल्लेल्या मिठाला जागावं, त्यांचा इतिहास रक्तरंजित, उद्धव ठाकरेंवरील जहरी टीकेला शिवसेनेचं जोरदार प्रत्युतर
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत पाहिल्यानंतर आजच केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी एक पत्रकार परिषदेत घेतली. या पत्रकार परिषदेत नारायण राणे यांनी आरोपांची लाईन लावली. त्यामध्ये त्यांचं मुख्य टार्गेट उद्धव ठाकरे तर दुसरं टार्गेट हे संजय राऊत (Sanjay Raut) राहिले. मात्र आता नारायण राणे यांच्या या जहरी टिकेनंतर शिवसेनेकडून नारायण राणे यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे. नारायण राणे यांनी खाल्लेल्या मिठाला तरी जागावं असा खोचक टोला शिवसेना नेत्या किशोरी पेडणेकर यांनी लगावला आहे. तर शिवसेनेचे कोकणातील नेते वैभव नाईक यांनीही राणेंवर त्याच भाषेत जोरदार पलटवार केला आहे, त्यामुळे आता पुन्हा राणे विरुद्ध शिवसेना हा सामना रंगताना पाहायला मिळतोय.

किशोरी पेडणेकर काय म्हणाल्या?

सर्वात आधी किशोरी पेडणेकर यांनी राणेंवर पलटवार केला आहे. नारायण राणेंची भाषा ही असंसदीय आहे. त्यांनी टीका जरुर केली असावी, मात्र त्याची एक भाषा असावी. जर केंद्रीय मंत्री अशा भाषेत बोलत असेल तर हे दुर्दैव आहे, तसेच जसे नारायण राणे उद्धव ठाकरेंना जवळून ओळखतात तसे उद्धव ठाकरे नारायण राणेंना जवळून ओळखतात. त्यामुळे खाल्लेल्या मिठाला जागायला पाहिजे, असा खोचक टोला हा पेडणेकरांनी लगावला आहे. तसेच कुठलाही कार्यकर्ता राबतो तेव्हा आमदार, खासदार होतात. मात्र म्हणून त्या ठिकाणाच्या सर्वोच्च पदाच्या व्यक्तीचे काहीच कर्तृत्व नाही असे म्हणणे चुकीचे आहे. नारायण राणेंचा रक्तरंजित इतिहास सर्व महाराष्ट्राला माहिती आहे, असेही त्या म्हणाल्या आहेत.

वैभव नाईक यांचाही पलटवार

नारायण राणेंनी याआधी किती सुपाऱ्या दिल्या हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. राणेंच्या पुत्राने सुद्धा सुपारी देऊन शिवसैनिकावर हल्ला केलेला. सुपारीबाज राणेंनी आमच्या नेत्यांवर आरोप करणे चुकीचे आहे. राणे शिवसेना सोडताना सोबत असलेले आमदार घरी बसले आहेत, असा पलटवार वैभव नाईक यांनी केला आहे.

पोलिसांना, सीबीआयला सांगा

तसेच राणेंना त्यांना मारण्याची सुपारी कोणी दिली हे माहीत असेल तर ते त्यांनी पोलिसांना,सीबीआयला सांगितल पाहिजे. ते केंद्रीयमंत्री आहेत. जर कोणाचा खरोखरच सहभाग असेल तर निश्चितपणे कारवाई होईल आणि त्याला शिवसेनेचा विरोध असण्याचे कारण नाही. राणेंच्या मुलाने दिघे आणि बाळासाहेबांबद्दल काय उदगार काढले होते ते लोक विसरले नाहीत. राणेंच्या बोलण्याकडे फडणवीस व मुख्यमंत्री शिंदे सुद्धा लक्ष देत नाही, असा खोचक टोलाही नाईक यानी लगावला आहे.

बंडखोरांची राणेंनी मुलाखत घ्यावी

तसेच शिवसेनेतून बंडखोरी केलेल्यांची राणेंनी मुलाखत घ्यायला हवी. कारण बंडखोरी केल्यानंतर काय होत हे राणेंना उत्तम माहीती आहे. उध्दवजींवर आरोप करून राणेंनी बंडखोरी केली होती, त्यांची बंडखोरी मंत्रीपदासाठी आणि मुलांच्या पुनर्वसनासाठी होती. बंडखोरी केल्यानंतर शिवसेना औषधाला ही ठेवणार नाही अशी गर्जना करणाऱ्या राणेंचा त्याच शिवसैनिकांनी पराभव केला. चालू राजकीय घडामोडीत राणेंचे अस्तित्व शून्य आहे, त्यामुळे स्पर्धेत यायला राणेंची ही टीकेची भूमिका आहे. उद्धवजी आणि आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याला कसा प्रतिसाद मिळतो हे सिंधुदुर्गात लवकरच कळेल. राणेंनी वही पेन घेऊन बसावं, असे आव्हानही त्यांनी दिलं आहे.