“भाजपची मगरमिठी स्वीकारली, तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका” सामनातून इशारा

| Updated on: Jul 29, 2020 | 9:55 AM

"भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले" असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

भाजपची मगरमिठी स्वीकारली, तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका सामनातून इशारा
Follow us on

मुंबई : “भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात राहू नका. प्रयत्न करुन, जोरजबरदस्ती करुन, घोडेबाजारात रान पेटवूनही एखादे सरकार पडता येत नसेल तर मनाचा असा गोंधळ उडतो” अशी टीका शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’तून करण्यात आली आहे. (Shivsena Saamana answer on Chandrakant Patil comment over Shivsena BJP reunion)

“भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी नड्डा यांना आडवे जाणारे बालिश वक्तव्य केले. राज्याच्या हितासाठी आजही आम्ही शिवसेनेसोबत एकत्र यायला तयार आहोत. आता हे राज्याचे हित म्हणजे नक्की काय? भाजपला मुख्यमंत्रीपद मिळाले तरच राज्याचे हित, अन्यथा नाही. दुसरे असे की स्वतः फडणवीस, नड्डा वगैरे लोक शिवसेनेला स्वार्थी, अपयशी वगैरे दूषणे देत आहेत. मग शिवसेनेबरोबर जाऊन राज्याचे हित कसे साधणार? पाटील यांनी एक मान्य केले पाहिजे की, राज्यात सध्या जी व्यवस्था सुरु आहे ती शिवसेनेच्या मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली आहे व ती व्यवस्थाही राज्याच्याच हिताची आहे! भाजपची मगरमिठी स्वीकारली तरच राज्याचे हित या भ्रमात त्यांनी राहू नये” असा इशारा सामनाच्या अग्रलेखात दिला आहे.

हेही वाचा : ना आमचा शिवसेनेला प्रस्ताव, ना शिवसेनेचा आम्हाला : देवेंद्र फडणवीस

“विरोधी पक्षाने आक्रमक व्हावे व राज्याच्या हिताच्या प्रश्नांवर सरकारला कोंडीत पकडावे हे योग्यच आहे. विरोधी पक्ष जितका आक्रमक व सावध तितके सरकारचे काम पारदर्शक होत असते. त्यादृष्टीने नड्डा यांनी महाराष्ट्रातील विरोधी पक्षाला दिलेल्या सूचनांचे स्वागत करायलाच हवे. खरे तर नड्डा यांनी हे सांगण्याचीही गरज नव्हती. नड्डा यांनी सांगण्याआधीच विरोधी पक्षांनी आक्रमणाच्या तोफांना बत्ती लावलीच होती, पण बत्ती लावली तरी तोफा निशाणा साधतातच असे नाही.” असा टोलाही सामनातून लगावण्यात आला आहे.

“मध्य प्रदेश आणि राजस्थानातही त्यांनी तोफांच्या नळकांड्यास बत्ती लावली आहे. मध्य प्रदेशचे सरकार पडले, तर राजस्थानचे सरकार सध्या तेथील राज्यपालांच्या बगलेत गुदमरलेले दिसत आहे. बहुमतात असलेली विरोधकांची सरकारे पाडायची ही आक्रमणाची पद्धत आहे. महाराष्ट्रात आक्रमणाचे मार्ग वेगळे आहेत हे सांगायची गरज नाही.” असेही यात म्हटले आहे.

संबंधित बातमी :

शिवसेनेला उपरती झाली, तर ते येतील, भाजपने हात पुढे केला असे अर्थ काढू नका : चंद्रकांत पाटील

(Shivsena Saamana answer on Chandrakant Patil comment over Shivsena BJP reunion)