Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आदेशातले ते पाच प्रमुख मुद्दे ज्यानं राजकारण ढवळून निघतंय, स्पेशल रिपोर्ट

| Updated on: May 03, 2022 | 9:21 PM

ईदच्या एक दिवस आधी राज ठाकरे एक पत्रक काढले आणि आपली पुढील भूमिका ट्वीटद्वारे स्पष्ट करेल असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी पाच महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघतंय.

Raj Thackeray : राज ठाकरेंच्या आदेशातले ते पाच प्रमुख मुद्दे ज्यानं राजकारण ढवळून निघतंय, स्पेशल रिपोर्ट
राज ठाकरेंच्या आदेशातले ते पाच प्रमुख मुद्दे ज्यानं राजकारण ढवळून निघतंय
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या कठोर भूमिकेनंतर राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. औरंगाबादच्या सभेत राज ठाकरे यांनी राज्य सरकारला अल्टिमेटम दिला होता. 3 तारखेला ईद झाल्यानंतर 4 तारखेपासून ऐकणार नाही असा इशारा राज ठाकरे यांनी दिला होता. त्यानंतर ईदच्या एक दिवस आधी राज ठाकरे एक पत्रक काढले आणि आपली पुढील भूमिका ट्वीटद्वारे स्पष्ट करेल असे सांगितले. त्यानुसार राज ठाकरे यांनी एक पत्रक काढत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आवाहन (Appeal) केले आहे. या पत्रात राज ठाकरे यांनी पाच महत्वाचे मुद्दे सांगितले आहेत ज्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघतंय. (Special report on the five major issues in Raj Thackeray’s order that are stirring up politics)

राज ठाकरेंच्या पत्रकातील पाच मुद्दे

1. त्यांना आपली हनुमान चालिसा ऐकवा

2. सर्व स्थानिक मंडळांनी आणि सजग नागरिकांनी भोंगे काढण्यासाठी स्वाक्षरी मोहीम राबवावी आणि स्वाक्षऱ्यांची निवेदन पत्रे रोजच्या रोज पोलीस ठाण्यात नेऊन द्यावीत.

3. मशिदींमध्ये बांगेला सुरुवात झाल्या झाल्या पोलिसांसाठीच्या 100 या क्रमांकावर सजग नागरिकांनी दूरध्वनी करून भोंग्यांचा त्रासाबाबत तक्रार करावी. रोज करावी.

4. महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आम्ही आवाहन करतो की, कै. हिंदूहदयसम्राट, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी कित्येक वर्षांपूर्वी सर्व भोंग बंद झालेच पाहिजेत” हे सांगितलेलं आपण ऐकणार आहात; की तुम्हाला सत्तेवर बसवणाऱ्या बेगडी धर्मनिरपेक्षतावादी शरद पवार साहेब यांचे ऐकणार आहात? याचा फैसला महाराष्ट्रातील जनतेसमोर एकदाचा होऊन जाऊ दे.

5. माझ्या हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो, भोंगे हटवण्यासाठी सर्व राजकीय पक्षांची बंधनं झुगारुन एकत्र या. आता नाही, तर कधीच नाही.

राज ठाकरेंनी पत्रकात काय म्हटलंय ?

मशिदीवरचे भोंगे 4 मेपर्यंत उतरवा, असे आम्ही सरकारला आधीच सांगितले होते. परंतु याबाबत सरकारची भूमिका बोटचेपेपणाची आहे. या देशातल्या राज्य सरकारातला प्रत्येकजण सर्वोच्च न्यायालयाचे दाखले देतोय. धर्माच्या नावाखाली वयोवृद्ध, रुग्ण, अशक्त व्यक्ती, लहान मुले, विद्यार्थी यांना भोग्यांच्या आवाजामुळे होणाऱ्या त्रासाबाबत सर्वोच्च न्यायालयाचा जो निर्णय दिला आहे. त्या निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलेलं आहे की “रात्री 10 ते सकाळी 6 वाजेपर्यंत कुणालाही ध्वनिक्षेपक वापरता येणार नाही. प्रत्येक धर्मियांच्या सणांना तेवढ्याच दिवसांपुरती ध्वनिक्षेपक लावण्याची परवानगी मिळेल, परंतु 365 दिवस परवानगी मिळणार नाही. ध्वनिक्षेपकासाठीची परवानगी ही रोज घ्यावी लागेल.”

ध्वनिक्षेपक किती क्षमतेने लावावा त्याबाबतच्या मर्यादाही सर्वोच्च न्यायालयाने सांगितलेल्या आहेत. या मर्यादा मी तुम्हाला मुद्दामहून सांगत आहे- लोकवस्ती असेल त्या भागात कमीतकमी 10 डेसिबल आणि जास्तीतजास्त 45 ते 55 डेसिबल आवाजात ध्वनिक्षेपक लावता येतो. 10 डेसिबल म्हणजे आपण कुजबुज करतो तो आवाज आणि 55 डेसिबल म्हणजे आपल्या घरातल्या मिक्सरचा आवाज.

प्रश्न असा आहे की, सर्व भोंगे हे अनधिकृत आहेत. भोंगेच कशाला, बहुतांश मशिदीही अनधिकृत आहेत. हे सरकार अनधिकृत मशिदीवरील भोंग्यांना अधिकृत परवानग्या का आणि कशी देते? आणि जर परवानगी देणारच असाल तर आम्हालाही हिंदू देवळांनाही भोगे लावण्याची परवानगी द्यायलाच हवी. मुळात हा विषय धार्मिक नसून सामाजिक आहे. देशातील सर्वधर्मीयांना ध्वनिक्षेपकांमुळे होणाऱ्या ध्वनिप्रदूषणाचा त्रास होतो. ही बाब देशातल्या प्रत्येक सरकारला समजलीच पाहिजे. रस्त्यावर नमाजासाठी बसणे आणि वाहतूककोंडी करणं, हे कोणत्या धर्मात बसते? म्हणूनच आमचे मुस्लिमधर्मियांना एवढंच सांगणे आहे की, हा सामाजिक विषय आहे. हे आधी समजून घ्या. या विषयाला धार्मिक वळण देण्याचा प्रयत्न केला तर आमच्याकडून त्याचे उत्तर धर्मानच दिलं जाईल. (Special report on the five major issues in Raj Thackeray’s order that are stirring up politics)