Uddhav Thackeray : सर्दी, खोकल्यानं ग्रासलं, तरीही पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, बोलता बोलता म्हणाले, माफ करा कोविडनं त्रास होतोय

| Updated on: Jun 24, 2022 | 11:32 PM

एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. मात्र, उद्धव ठाकरे हे कोरोना ग्रस्त असल्यामुळे त्यांना बोलताना खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्याचं जाणवत होतं. मात्र, पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आजारपणातही मैदानात उतरल्याचं दिसत आहे.

Uddhav Thackeray : सर्दी, खोकल्यानं ग्रासलं, तरीही पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे मैदानात, बोलता बोलता म्हणाले, माफ करा कोविडनं त्रास होतोय
सुप्रीम कोर्टाचा तो एक निर्णय ज्यानं उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग मोकळा झाला
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंडाचं निशाण फडकावल्यानंतर शिवसेनेत मोठा भूंकप पाहायला मिळाला. मात्र आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्याकडून संघटना बांधणीसाठी जोरदार प्रयत्न सुरु असल्याचं पाहायला मिळत आहे. आमदार फुटले असले तरी शिवसेनेची खरी ताकद ही शिवसैनिक आहेत आणि त्या शिवसैनिकांना विश्वास देण्यासाठी उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे विभाग प्रमुख, जिल्हा प्रमुख आणि नगरसेवकांच्या बैठकीचा धडाका लावलाय. शुक्रवारी रात्री ठाकरे यांनी नगरसेवकांना ऑनलाईन संबोधित केलं. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्यासह बंडखोर आमदारांवर उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्ला चढवला. मात्र, उद्धव ठाकरे हे कोरोना ग्रस्त असल्यामुळे त्यांना बोलताना खोकला आणि सर्दीचा त्रास होत असल्याचं जाणवत होतं. मात्र, पक्ष वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे आजारपणातही मैदानात उतरल्याचं दिसत आहे.

नगरसेवकांच्या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, आज विशेष काय तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सोबत राहणार हे जाहीर केलं. पाठीत खंजीर कुणी खुपसला तर आपल्याच लोकांनी. त्यांची ओळख ही शिवसैनिकांनी निर्माण केलीय. यातील अनेक आमदार जिथे निवडून आले तिथे तुम्हीही निवडून येऊ शकत होता. पण पक्षानं दिलेला उमेदवार तुम्ही निवडून आणला ही खरी निष्ठा. तुम्ही निवडून दिलेले नाराज होऊन जात आहेत आणि तुमचा हक्क असतानाही मी देऊ शकलो नाही. तरी नाराज न होता तुम्ही सोबत राहिलात, मी तुमचे आभार कसे मानू. नगरसेवक हे आपलं वैभव आहे. महापौर निवडून येणं हे आपलं वैभव आहेच. पण आपले आमदार निवडून यायला लागले. मी मुख्यमंत्री म्हणून आज तुमच्यासमोर बोलतोय हे किती मोठं वैभव आहे. नाही म्हणलं तरी दिल्लीत आपले आज 22 – 23 खासदार आहेत. यामागे सगळी मेहनत तुमचीच आहे, माझी नाही.

एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर हल्लाबोल

‘आज मला फोन आले की काही ठिकाणी असे फोन यायला लागले आहेत की, उद्धव साहेबांनीच आम्हाला हे सगळं सांगितलं आहे तुम्ही आमच्यासोबत असा असे फोन सुरु झाले आहेत. हा काय प्रकार आहे. म्हणजे शिवसैनिकांच्या, जनतेच्या नात संभ्रम निर्माण करायचा. एकदा म्हणायचं मुख्यमंत्री भेट नाहीत. राष्ट्रवादी फंड देत नाही. काँग्रेस मदत करत नाही आणि आता हा काय प्रकार आहे’, असा आरोपही त्यांनी एकनाथ शिंदे आणि बंडखोर आमदारांवर केलाय.

बंडावरुन उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आमनेसामने!

बंडखोरीची कुणकुण लागली तेव्हा मी एकनाथ शिंदेंना बोलावून घेतलं आणि सांगितलं की हे बघा तुम्हाला जबाबदारी दिली तरी शिवसेनेच्या आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी, कार्यकर्त्यांची कामं पूर्ण करण्याची. पण आता त्याला वेगळं वळण लागतं असल्याचं माझ्या कानावर येत आहे ते काही योग्य नाही. मला म्हणाले की साहेब ते राष्ट्रवादीवाले खूप त्रास देतेय. सांगा मला, तोंडावर बोलतो त्यांच्या तोंडावर, या माझ्यासमोर आपण एक घाव दोन तुकडे करु. पण ते म्हणाले की आमदारांचा माझ्यावर दबाव आहे आणि आपण भाजपसोबत गेले पाहिजे. मग मी त्यांना बोललो की आणा माझ्यासमोर आमदारांना, मला पटलं तर, शिवसैनिकांची इच्छा असेल तर चला भाजपसोबत. जो भाजप आपल्यासोबत विश्वासघाताने वागला आहे. 2014 ला युती तोडली, 2019 ला आपल्याविरोधात बंडखोर उभे केले, आपल्याला दिलेली वचनं त्यांनी नाकारली. त्याच भाजपसोबत जायचं असेल तर एक गोष्ट अजून पाहिजे, भाजपकडून आपल्याला चांगला प्रस्ताव आला पाहिजे. आपल्या लोकांमागे जो काही चौकशीचा ससेमिरा लावलाय, ते काय आहे. आता जे काही अडकलेले आहेत ते भाजपसोबत गेले की स्वच्छ होणार आहेत. पण आपल्यात राहिले तर त्यांना आत टाकतो, ही कोणत्या मैत्रीचं लक्षण आहे? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी विचारला.

कोविडने ग्रस्त असूनही पक्ष वाचवण्यासाठी मैदानात!

नेमका त्यावेळी त्यांना थोडा खोकला लागला. तसंच त्यांना सर्दीचाही त्रास जाणवत होता. तेव्हा ते म्हणाले की सॉरी… कोविडमुळे थोडा खोकला येतोय. दुपारीही जिल्हा प्रमुखांच्या बैठकीत कोविडमुळे उद्धव ठाकरे यांना त्रास जाणवत होता. त्यांच्या डोळ्याला पाणी येत होतं. तेव्हा टिशू पेपरने ते डोळ्याच्या कडा पुसत होते. तेव्हाही त्यांनी सांगितलं की कोविडमुळे डोळ्यातून, नाकातून पाणी येत आहे. नाहीतर येईल ब्रेकिंग न्यूज उद्धव ठाकरेना अश्रू अनावर.. पण तसं नाही मी आजारी असल्यामुळे थोडा त्रास होतोय, असं सांगत उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन सुरुच ठेवलं. त्यामुळे आमदार सोडून गेले असले तरी शिवसैनिकांना शिवबंधनात बांधून ठेवण्यासाठी उद्धव ठाकरे आजारपणातही मैदानात उतरल्याचं दिसून येत आहे.