निवड समिती सदस्यपदासाठी अजित आगरकरसह ‘हे’ तीन धुरंदर इच्छूक, बीसीसीआयकडे अर्ज

| Updated on: Nov 15, 2020 | 7:05 PM

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीतील तीन रिक्त पदांसाठी चार माजी खेळाडूंनी अर्ज दाखल केले आहेत.

निवड समिती सदस्यपदासाठी अजित आगरकरसह हे तीन धुरंदर इच्छूक, बीसीसीआयकडे अर्ज
Follow us on

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाच्या (Indian Cricket Team) निवड समितीत तीन पदे रिक्त आहेत. बीसीसीआय लवकरच ही रिक्त पदे भरणार आहे. त्यासाठी अनेक मोठ-मोठ्या खेळाडूंनी अर्ज केले आहेत. टीओआयच्या वृत्तानुसार टीम इंडियातील माजी जलदगती गोलंदाज अजित आगरकर (Ajit Agarkar), चेतन शर्मा (Chetan Sharma), मनिंदर सिंह आणि शिव सुंदर दास यांसारख्या माजी क्रिकेटर्सनी अर्ज दाखल केले आहेत. (Ajit Agarkar, Maninder Singh, Chetan Sharma applied for Indian Team Selection Committee Member)

या पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी 15 नोव्हेंबर ही अखेरची तारीख होती. दरम्यान केवळ तीनच सदस्यपदं रिक्त असताना चार मोठ्या माजी खेळाडूंनी अर्ज दाखल केल्याने या चारपैकी कोणाची निवड करायची असा मोठा प्रश्न बीसीसीआयसमोर उभा ठाकला आहे.

आगरकर आणि चेतन शर्मा जलदगती गोलंदाज होते. मनिंदर सिंह फिरकीपटू तर शिव सुंदर दास हे सलामीचे फलंदाज होते. दरम्यान बंगालचे माजी जलदगती गोलंदाज राणादेव बोस यांनीदेखील निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज दाखल केला आहे. चेतन शर्मा आणि बोस या दोघांपैकी एकाचीच निवड होऊ शकते. देशांतर्गत क्रिकेटमध्ये दोघेही बंगालसाठी खेळायचे.

सदस्यांच्या निवडीबाबत बीसीसीआयची परंपरा आणि संविधान काय म्हणतं?

भारतीय क्रिकेट संघाच्या निवड समितीमधील सदस्य हे आपापल्या झोनचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे ज्या झोनच्या प्रतिनिधीचा कार्यकाळ संपेल त्याच झोनच्या माजी खेळाडूला अथवा तिथल्या व्यक्तीला संधी देण्यात येते. बीसीसीआयच्या याच परंपरेनुसार यावर्षीच्या सुरुवातीला सुनील जोशी आणि हरविंदर सिंह यांची निवड समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली. परंतु बीसीसीआयचं नवं संविधान या परंपरेला मानत नाही. त्यात म्हटलं आहे की, जो सर्वोत्तम उमेदवार असेल, त्याचीच निवड व्हायला हवी.

अजित आगरकर आणि मनिंदर सिंह यांनी मागील वेळीदेखील निवड समिती सदस्यपदासाठी अर्ज दाखल केले होते. परंतु त्यावेळी दोघांनाही डावलण्यात आलं. त्यावेळी बीसीसीआयचा अध्यक्ष सौरव गांगुली म्हणाला होता की, आगरकर आणि मनिंदर यांना पुन्हा एकदा अर्ज करण्याची गरज पडणार नाही. दोघांचेही जुने अर्ज कायम राहतील. परंतु दोघांनीही कोणतीही जोखीम न पत्करता पुन्हा एकदा अर्ज दाखल केला आहे.

अजित आगरकर निवड समितीच्या अध्यक्षपदाचा प्रमुख दावेदार

दरम्यान, असं म्हटलं जातंय की आगरकर निवड समितीच्या प्रमुखपदाचा मुख्य दावेदार आहे. आगरकरडे आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा तगडा अनुभव आहे. आगरकरने 26 कसोटी, 191 एकदिवसीय आणि चार टी-20 सामन्यांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व केलं आहे. यामध्ये त्याने 349 विकेट मिळवल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये त्याने 42 सामन्यांमध्ये 29 बळी मिळवले आहेत.

इतर बातम्या

India Tour Australia | विराट कोहली क्रिकेट विश्वातील पावरफुल खेळाडू, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराकडून कौतुक

Rohit Sharma | “हिटमॅनचे आकडेच सर्व काही सांगतात”, रोहितला कर्णधार करण्याच्या मागणीवरुन नासिर हुसैनची प्रतिक्रिया

(Ajit Agarkar, Maninder Singh, Chetan Sharma applied for Indian Team Selection Committee Member)