Asia CUP India Squad Selection: भारताने वेस्ट इंडिज विरुद्ध वनडे पाठोपाठ टी 20 मालिकेतही दमदार विजय मिळवला. भारताने एकतर्फी टी 20 मालिका जिंकली. भारताने 4-1 असा विजय मिळवला. आता पुढचं लक्ष्य आशिया कप आहे. आशिया कप मध्ये भारतासमोर पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश यांचं मुख्य आव्हान असेल. वेस्ट इंडिज विरुद्ध मालिकेत भारताने वेगवेगळे प्रयोग करुन पाहिले. महत्त्वाचं म्हणजे त्याला चांगलं यशही मिळालं. त्यामुळे आशिया कपसाठी संघ निवडताना, बीसीसीआयच्या निवड समितीची डोकेदुखी वाढणार आहे. अक्षर पटेल, रवी बिश्नोई आणि कुलदीप यादव या तिन्ही फिरकी गोलंदाजांनी जबरदस्त प्रदर्शन केलय. त्यामुळे आज निवड समितीला खूपच काळजीपूर्वक संघ निवड करावी लागेल.
आशिया कप स्पर्धेकसाठी संघ निवडण्यासाठी आज बैठक होणार आहे. हेड कोच राहुल द्रविड आणि कॅप्टन रोहित शर्मा व्हर्च्युअली या बैठकीत सहभागी होतील. कालच वेस्ट इंडिज विरुद्धची टी 20 मालिका संपली असून ते अमेरिकेत आहेत. या बैठकीसाठी निवड समिती सदस्य आज मुंबईत उपस्थित असतील.
15 पैकी 12 सदस्यांची निवड निश्चित मानली जात आहे. चुरस फक्त 3 जागांसाठी आहे. अर्शदीप सिंह या शर्यतीत आघाडीवर आहे. अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांच्या निवडीसाठी डिबेट होईल. विराट कोहली आणि केएल राहुल दोघेही टी 20 संघाचा भाग असतील. दीपक चाहर सुद्धा कमबॅकसाठी सज्ज आहे.
विराट कोहलीने त्याच्या उपलब्धतेबद्दल निवड समिती सदस्यांना कळवलं आहे. विराट कोहलीला वेस्ट इंडिज आणि झिम्बाब्वे दौऱ्यासाठी विश्रांती देण्यात आली आहे. त्याचा फॉर्म हा मुख्य चिंतेचा विषय आहे. संघातील त्याच्या तिसऱ्या क्रमांकाच्या जागेला कुठलाही धोका नाहीय. आशिया कप मध्ये त्याने फार सरस कामगिरी केली नाही, तरी त्याचा अनुभव आणि मॅच जिंकून देण्याची क्षमता महत्त्वाची ठरते. आशिया कपसाठी कोणा, कोणाची निवड होते, त्याची उत्सुक्ता आहे. कारण हाच संघ ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी 20 वर्ल्ड कप मध्ये दिसू शकतो.