IPL: बीसीसीआयचा आयपीएल स्पर्धेसाठी मेगा प्लान, सामन्यांची संख्या वाढणार आणि काय ते जाणून घ्या
आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्यात आहे. मात्र बीसीसीआयच्या डोक्यात पुढचा प्लान शिजत आहे. 2028 आयपीएल स्पर्धेचं रूप पालटण्यासाठी आतापासून तयारी सुरू झाली आहे. म्हणजेच पुढचं पर्व आहे तसंच होईल. पण त्याच्या पुढच्या पर्वात बराच बदल झालेला असेल.

आयपीएल ही जगभरातील मोठी आणि श्रीमंत लीगपैकी एक आहे. आयपीएल स्पर्धेचं यंदा 19वं पर्व सुरू आहे. तर पुढच्या 20वं पर्व असणार आहे. मात्र बीसीसीआयने 21व्या पर्वासाठी आतापासूनच तयारी करण्यास सुरूवात केली आहे. कारण हे पर्व खास असणार आहे. या स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव प्रक्रिया पार पडेल. त्यानंतर स्पर्धेचं स्वरूपही बदललेलं असणार आहे. इंडिया टुडेच्या एका रिपोर्टनुसार, आयपीएल सामन्याची संख्या वाढवण्याचा विचार केला जात आहे. आयपीएल 2028 म्हणजेच 21व्या पर्वात सामन्यांची संख्या 74 वरून 94 होण्याची शक्यता आहे. म्हणजेच ही स्पर्धा डबल राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळली जाईल. प्रत्येक संघाचा एकमेकांशी दोनदा आमनासामना होईल. जेव्हा स्पर्धेत आठ संघ होते तेव्हाही प्रत्येक संघ डबल राउंड रॉबिन फॉर्मेटमध्ये खेळत होते.
आयपीएल 2022 मध्ये लखनौ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांचा समावेश झाला. त्यानंतर संघांची संख्या ही 10 झाली. 74 सामन्यात प्रत्येक संघाच्या वाटेला 14 साने आले आहे. मात्र भविष्यात ही संख्या 94 वर गेली तर प्रत्येक संघाला 18 सामने खेळावे लागतील. म्हणजेच प्रत्येक संघासोबत दोन सामने होतील. सध्या आयपीएल स्पर्धा 60 ते 65 दिवसात संपून जाते. मात्र सामन्यांची संख्या वाढली तर एक पर्व अडीच महिन्यांपर्यंत चाले. आयपीएल 2027 पर्यंत सर्व द्विपक्षीय मालिकांचं वेळापत्रक ठरलं आहे. त्यानंतर आयपीएल स्पर्धेचा अवधी वाढवली जाऊ शकते, असं अरूण सिंह धूमल यांनी सांगितलं.
आयपीएल 2026 स्पर्धा आता शेवटच्या टप्प्याकडे कूच करत असताना प्रेक्षक संख्येत कमालीची घट झाली आहे. इतकंच काय तर गुणतालिकेतील समीकरणही कंटाळवाणं झालं आहे. हे सर्व गणित पाहता, नव्या फॉर्मेटमध्ये डबल राउंड रॉबिन फॉर्मेट येईल. त्यामुळे गुणतालिका फुटबॉल लीग सारखी तयार केली जाण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, या स्पर्धेसाठी संघांची संख्या ही 10 असणार आहे. म्हणजेच यापूर्वी दोन नव्या संघांची भर पडेल असं बोललं जात होते, त्याला पूर्णविराम लागला आहे. कारण अडीच महिन्यात 12 संघाचं वेळापत्रक बसवणं कठीण जाईल.