IND vs SA : भारताने पराभूत करताच दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराने खरं काय ते सांगितलं

चार सामन्यांच्या टी20 मालिकेत भारताने दक्षिण अफ्रिकेला 61 धावांनी पराभूत केलं. पहिल्याच सामन्यात विजय मिळवून भारताने 1-0 ने आघाडी घेतली आहे. तसेच सलग 11वा टी20 सामना जिंकला आहे. या पराभवामुळे दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम चांगलाच संतापला आहे.

IND vs SA : भारताने पराभूत करताच दक्षिण अफ्रिकेच्या कर्णधाराने खरं काय ते सांगितलं
| Updated on: Nov 09, 2024 | 5:09 PM

भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यात चार सामन्यांच्या टी20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात टीम इंडियाने विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करमने प्रथम गोलंदाजी स्वीकारली. मात्र हा निर्णय चुकला असंच म्हणावं लागेल. कारण संजू सॅमसनने शतकी खेळीसह दक्षिण अफ्रिकेचं विजयाचं स्वप्न धुळीस मिळवलं. त्याच्या खेळीमुळे टीम इंडियाने 8 गडी गमवून 202 धावा केल्या आणि विजयासाठी 203 धावांचं आव्हान दिलं. दक्षिण अफ्रिकेचा संघ सर्व गडीबाद 141 धावा करू शकला. नाणेफेक जिंकल्यानंतर एडन मार्करमने गोलंदाजीचा घेतलेला निर्णय चुकीचा होता, असं मत क्रीडातज्ज्ञांनी व्यक्त केला आहे. पण दक्षिण अफ्रिकेचा कर्णधार एडन मार्करम याचं मात्र वेगळंच मत आहे.

नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर घेतलेला निर्णय चुकला का? या प्रश्नावर एडन मार्करम याने सांगितलं की, ‘नाणेफेकीचा कौलचा याचाशी काही संबंध नव्हता.दोन्ही नव्या चेंडूंसोबत अतिरिक्त उसळी मिळत होती. दोन्ही डावात असंच होतं. एकदा का नवा चेंडू जुना झाला की खेळ सोपा होतो. आम्ही चांगली सुरुवात करू शकलो नाहीत. हेच आमच्या पराभवाचं कारण आहे.’ भारत आणि दक्षिण अफ्रिका यांच्यातील दुसरा सामना 10 नोव्हेंबरला होणार आहे. या सामन्यात दक्षिण अफ्रिका कमबॅकसाठी प्रयत्नशील असेल. आता मालिकेत बरोबरी साधली जाते की आघाडी घेतली जाते हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

“संजू सॅमसन खरंच खूप छान खेळला. आमच्या गोलंदाजांना दबावात ठेवलं. त्याने इतकी जबरदस्त खेली की त्याला रोखणं कठीण गेलं.” असंही मार्करमने पुढे सांगितलं. ‘डेथ ओव्हरमध्ये गोलंदाजी करणाऱ्या गोलंदाजांसोबत आमची बैठक झाली होती. गेराल्ड कोएत्झी आणि मार्को यानसेनने चांगली गोलंदाजी केली. आमचा पराभव झाला असला तरी आमच्यासाठी ही सकारात्मक बाब आहे.’, असंही मार्करमने पुढे सांगितलं. भारताने टी20 क्रिकेटमधील हा सलग 11 वा विजय होता. झिम्बाब्वे दौऱ्यात पहिला सामना गमवल्यानंतर टीम इंडियाने कमबॅक केलं. त्या मालिकेतील 4 सामने सलग जिंकले. तर श्रीलंका आणि बांगलादेशला तीन सामन्यांच्या मालिकेत 3-0 ने व्हाईट वॉश दिला. आता दक्षिण अफ्रिकेला पहिल्या सामन्यात पराभूत केलं.

Follow Us