IND vs SL 1st Test: विराटने जास्त धावा केल्या नव्हत्या पण…दिलीप वेंगसरकरांनी सांगितला कोहलीच्या निवडीचा किस्सा

| Updated on: Mar 04, 2022 | 12:49 PM

IND vs SL 1st Test: भारतीय क्रिकेटला विराट कोहलीसारखा (Virat kohli) प्रतिभावान क्रिकेटपटू देण्यांचं श्रेय माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांना जातं. दिलीप वेंगसरकर 2008 साली BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष होते.

IND vs SL 1st Test: विराटने जास्त धावा केल्या नव्हत्या पण...दिलीप वेंगसरकरांनी सांगितला कोहलीच्या निवडीचा किस्सा
विराट कोहली-दिलीप वेंगसरकर
Image Credit source: PTI
Follow us on

मुंबई: भारतीय क्रिकेटला विराट कोहलीसारखा (Virat kohli) प्रतिभावान क्रिकेटपटू देण्यांचं श्रेय माजी कर्णधार दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांना जातं. दिलीप वेंगसरकर 2008 साली BCCI च्या निवड समितीचे अध्यक्ष होते. त्यावेळीच कोहलीची भारतीय संघात निवड झाली होती. मलेशियात अंडर 19 वर्ल्डकप (under 19 world cup) जिंकल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात विराट कोहलीला भारतीय संघात संधी मिळाली होती. आज विराट आपला 100 वा कसोटी सामना खेळतोय, पण त्यावेळी विराटची भारतीय संघात कशी निवड झाली, तो घटनाक्रम दिलीप वेंगसरकर यांनी उलगडला. दिलीप वेंगसरकरांनी निवड समितीमध्ये असताना, नेहमीच भारतीय क्रिकेटच्या भविष्याचा विचार केला. युवा प्रतिभावान फलंदाजांना जास्तीत जास्त संधी दिली. त्यामुळेच भारतीय क्रिकेटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एक उंची गाठता आली.

अंडर 16 मध्ये कोहलीला पहिल्यांदा पाहिलं

“मी सर्वप्रथम विराट कोहलीला कोलकात्यात अंडर 16 च्या स्पर्धेत दिल्लीकडून खेळताना पाहिलं. त्याने जास्त धावा केल्या नाहीत. पण मला त्याची खेळण्याची पद्धत आकर्षक वाटली. त्यानंतर तो भारतासाठी अंडर 19 मध्ये खेळला आणि खूपच चांगली कामगिरी केली. त्यांनी वर्ल्डकप जिंकला. त्यानंतर ऑस्ट्रेलियात उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक स्पर्धा झाली” वेंगसरकर हा सर्व घटनाक्रम सांगतानाच व्हिडिओ बीसीसीआयने अपलोड केला आहे.

पुढची इतकी वर्ष सहज खेळेल

मी निवड समितीचा अध्यक्ष होतो. स्पर्धेसाठी अंडर 23 मधील खेळाडू निवडले. ते भारतीय क्रिकेटचे भवितव्य होते. विराट कोहलीची त्यामध्येच निवड झाल्याची आठवण वेंगसरकरांनी सांगितली. भारतीय क्रिकेटचे कर्नल दिलीप वेंगसरकर यांनी 100 वा कसोटी सामना खेळणाऱ्या विराट कोहलीला शुभेच्छा दिल्या आहेत. विराट आता 33 वर्षांचा आहे. पण तो भारतीय क्रिकेटला अजून बरच काही देऊ शकतो. आणखी पाच वर्ष तो सहज खेळेल असं वेंगसरकरांच मत आहे.

कशामध्ये आहे विराटचा क्लास?

“भारतासाठी 100 कसोटी सामने खेळणं ही खूप मोठी कामगिरी आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू म्हणून यातून विराटचा क्लास दिसून येतो. त्याचं लक्ष्य, आवड आणि शिस्त यामुळेच भारतासाठी तो इतकी वर्ष क्रिकेट खेळतोय. तो खूप तरुण आहे. फिट आहे आणि अजून पाच-सहा वर्ष तो सहज खेळेल. जगातला तो एक सर्वोत्तम क्रिकेटपटू आहे” असा शब्दात वेंगसरकरांनी कोहलीचं कौतुक केलं.