
भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात पुढील महिन्यात होणाऱ्या एकदिवसीय आणि टी-20 मालिकेवरही कोरोना विषाणूच्या संसर्गाचं सावट दिसून येत आहे. भारतात कोरोनाबाधित रुग्णांची झपाट्याने वाढणारी संख्या पाहता, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ दोन्ही संघांमध्ये खेळवल्या जाणाऱ्या ODI आणि T20 मालिकेच्या स्थळांची (वेन्यू) संख्या कमी करू शकते.

वेस्ट इंडिजचा संघ 1 फेब्रुवारीला भारत दौऱ्यावर येईल, त्यानंतर दोन्ही संघांमध्ये 3 वनडे आणि 3 टी-20 सामन्यांची मालिका खेळवली जाईल. वेळापत्रकानुसार, हे सर्व सामने वेगवेगळ्या शहरांमध्ये खेळवले जाणार आहेत, परंतु मंडळ त्यापैकी तीन ठिकाणं कमी करू शकतं.

पीटीआय या वृत्तसंस्थेने बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, सध्या कोणताही निर्णय झालेला नाही. ही अस्थिर परिस्थिती आहे आणि आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत आणि योग्य वेळी निर्णय घेऊ."

उभय संघांमधील एकदिवसीय मालिकेला सुरुवात 6 फेब्रुवारीपासून होईल. पहिला एकदिवसीय सामना अहमदाबादमध्ये खेळवला जाणार आहे. त्यानंतर, दुसरी वनडे (9 फेब्रुवारी) जयपूरमध्ये आणि तिसरी वनडे (12 फेब्रुवारी) कोलकात्यात खेळवली जाईल. यानंतर टी-20 मालिकेतील पहिला सामना कटक (15 फेब्रुवारी), दुसरा टी-20 सामना विशाखापट्टणम (18 फेब्रुवारी) आणि शेवटचा टी-20 तिरुअनंतपुरममध्ये (20 फेब्रुवारी) खेळवला जाईल.