रोहित शर्माने टी20 कॅप्टन्सीबाबत स्पष्टपणे उत्तर दिलं, म्हणाला “माझ्यासाठी हे काय…”
टी20 वर्ल्डकपसाठी टीम इंडिया सज्ज झाली आहे. 11 वर्षानंतर पुन्हा एकदा आयसीसी चषक जिंकण्याचं स्वप्न उराशी बाळगून संघ अमेरिका वेस्ट इंडिज येथे जाणार आहे. या स्पर्धेसाठी संघ निवडल्यानंतर कर्णधार रोहित शर्मा आणि निवड समिती अध्यक्ष अजिक आगरकर पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे गेले.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेनंतर पुन्हा एकदा टी20 संघाची धुरा रोहित शर्माच्या हाती सोपवली आहे. वनडे वर्ल्डकप स्पर्धेच्या अंतिम फेरीत पराभव झाल्यानंतर रोहितसेना पुन्हा एकदा टी20 वर्ल्डकपसाठी सज्ज झाली आहे. टी20 वर्ल्डकप स्पर्धा अमेरिका आणि वेस्ट इंडिज येथे होणार आहे. टीम इंडियाकडे आणखी एक आयसीसी चषक जिंकण्याची संधी आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वात टीम इंडिया मैदानात उतरणार आहे. तत्पूर्वी बीसीसीआयने टीम इंडियाची घोषणा केली आहे. यानंतर पत्रकार परिषदेत प्रश्नांची उत्तरं दिली. यावेळी रोहित शर्माने न डगमगता प्रत्येक प्रश्नांचं सडेतोड उत्तर दिलं. तसेच संघासोबत पुढील आव्हानांना सामोरं जाण्यास सज्ज असल्याचं दाखवून दिलं आहे. यावेळी पत्रकार परिषद सुरु होताच रोहित शर्माकडे कर्णधारपद सोपवल्याबद्दल प्रश्न विचारला. त्यावर रोहित शर्माने स्पष्टीकरण दिलं. “मी कर्णधार होतो. मध्येच कर्णधार नव्हतो आणि पुन्हा जबाबदारी घेतली आहे. हा जीवनाचा भाग आहे. प्रत्येक गोष्ट तुम्ही ठरवता तशी होत नाही. हा एक चांगला अनुभव आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा म्हणाला.
“क्रिकेटची सुरुवात करताना मी कॅप्टन नव्हतो. दुसऱ्या कॅप्टन्सच्या हाताखाली खेळलो. यात काहीच नाही. मी एक खेळाडू म्हणून जे आवश्यक आहे ते करण्याचा मी नेहमीच प्रयत्न केला आहे आणि मी गेल्या 1 महिन्यात ते करण्याचा प्रयत्न केला आहे.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं. “अमेरिकेतील खेळपट्टी कशी असेल हे माहिती नाही. आम्ही वेस्ट इंडिजमध्ये खेळलो आहोत. पण वेगवेगळ्या ठिकाणी. त्यामुळे विरोधी संघांचं कॉम्बिनेशन पाहावं लागेल. मधल्या फळीत चांगली फटकेबाजी करणारा फलंदाज आम्ही पाहात होतो. आघाडीचे फलंदाज चांगले खेळतात यात शंका नाही.”, असंही रोहित शर्मा पुढे म्हणाला.
“मधल्या षटकांमध्ये मुक्तपणे खेळणाऱ्या फलंदाजाच्या शोधात होतो. कोण बॉलिंग टाकतंय हे सर्व विसरून फटकेबाजी करणारा फलंदाज हवा होता. शिवम दुबेने ही कामगिरी आयपीएलमध्ये करून दाखवली आहे. पण असं असलं तरी प्लेइंग इलेव्हनबाबत आता काहीच सांगता येणार नाही. आम्ही हे सर्व सराव आणि विरोधी संघांच्या कॉम्बिनेशननंतर ठरवू.”, असं कर्णधार रोहित शर्मा याने सांगितलं.