सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळी सरस? भावाच्या एका उत्तराने सगळं चित्र स्पष्ट

माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी याच्या भावाने नुकतीच एका युट्यूब चॅनेलला मुलाखत दिली. त्याच्या मुलाखतीमुळे पुन्हा एकदा सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी हा विषय चर्चेला आला आहे. त्याने या दोघांच्या नात्याबाबत काय सांगितलं ते जाणून घ्या.

सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळी सरस? भावाच्या एका उत्तराने सगळं चित्र स्पष्ट
सचिन तेंडुलकरपेक्षा विनोद कांबळी सरस? भावाच्या एका उत्तराने सगळं चित्र स्पष्ट
Image Credit source: PTI
| Updated on: Aug 20, 2025 | 9:52 PM

क्रिकेटविश्वात विनोद कांबळी हा दुर्दैवी क्रिकेटपटू ठरला. यशाच्या उंच शिखरावर असताना कधी आपटला कळलंच नाही. पण असं असलं तरी आजही त्याच्या फलंदाजीच्या चर्चा होत आहे. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांचे गुरु रमाकांत आचरेकर.. दोघांनी एकत्र क्रिकेटचे धडे गिरवले. पण विनोद कांबळी यात कमनशिबी ठरला. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने यशाचं शिखर गाठलं. पण आजही लोकं विनोद कांबळीच्या फलंदाजीचे चाहते आहेत. पण खरंच त्याची फलंदाजी इतकी जबरदस्त होती का? त्याचं उत्तर विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्रने एका वाक्यात दिलं आहे. वीरेंद्र स्पष्ट केलं की, ‘असं चित्र मीडियाने तयार केलं. विनोद कांबळीने कधीच असा दावा केला नाही की तो सचिन तेंडुलकरपेक्षा चांगला आहे.’

विनोद कांबळीचा भाऊ वीरेंद्रने विक्री लालवानीच्या युट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत बरंच चित्र स्पष्ट केलं. ‘तुम्ही असं बोलू शकत नाही की माझा भाऊ सचिनपेक्षा मोठा होता की छोटा. ते दोघेही समान होते. मी कधीच माझ्या भावाकडून असं ऐकलं नाही की सचिनपेक्षा मी बेस्ट होतो.’ इतकंच काय तर वीरेंद्रने विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरच्या नात्यावरही प्रकाशझोत टाकला. तसेच त्यांच्यातील बिघडलेल्या संबंधाबाबतही सांगितलं. ‘नाही.. हे खरं नाही.. सचिन दादाने कायम विनोदला पाठिंबा दिला. त्यांची मैत्री आजही मजबूत आहे. सचिन कॉल करतो आणि त्याची विचारपूस करतो.’

वीरेंद्रने लहानपणी क्रिकेटचे धडे गिरवले आहेत. त्या जोरावर आता अॅकाडमी चालवतो. वीरेंद्रने विनोद कांबळीच्या शिस्तीबाबत फार काही सांगितलं नाही. पण इतकं मात्र स्पष्ट केलं की, ग्लॅमरमुळे त्याने बरंच काही गमावलं. त्यामुळे त्याच्या विद्यार्थ्यांना पाय जमिनीवर ठेवण्याचा सल्ला कायम देतो. ‘मी हा संदेश देईन की जरी तुम्ही क्रिकेट खेळलात आणि तुम्हाला ग्लॅमर मिळाला तरी, जमिनीवर राहायला शिका.’ सचिन तेंडुलकरने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1989 मध्ये पदार्पण केलं. तर विनोद कांबळी 1991 मध्ये देशासाठी पहिला सामना खेळला. पण सचिन तेंडुलकरची कारकीर्द दीर्घकाळ चालली तर विनोद कांबळीच्या कारकि‍र्दीला ब्रेक लागला.