Virat Kohli : मी थकलोय…. विराटचं विधान चर्चेत, वनडे सीरिज जिंकल्यानंतर असं का म्हणाला कोहली ?

विराट कोहलीने आपण थकलेलं असल्याचं सांगितलं. पण का? समोर आलेल्या व्हिडिओमध्ये हा खुलासा झाला आहे. अहमदाबादमध्ये खेळण्यात आलेल्या वनडेनंतर हा व्हिडिओ समोर आला आहे. नक्की काय म्हणाला विराट जाणून घेऊया.

Virat Kohli : मी थकलोय.... विराटचं विधान चर्चेत, वनडे सीरिज जिंकल्यानंतर असं का म्हणाला कोहली ?
विराट कोहली
| Updated on: Feb 13, 2025 | 10:41 AM

टीम इंडियाने अहमदाबादमध्ये इंग्लंडविरुद्धची शेवटची वनडेही जिंकली. या विजयासह भारतीय संघाने 14 वर्षांनंतर इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत क्लीन स्वीप करण्याची संधीही साधली. अहमदाबाद वनडेत भारताच्या विजयात विराट कोहलीच्या अर्धशतकाचाही मोठा वाटा आहे. त्याने शतक झळकवावं अशी सर्व चाहत्यांची इच्छा होती, पण त्याच्या अर्धशतकावरच फॅन्सना समाधान मानावं लागलं. मात्र, अहमदाबादमध्ये भारताच्या विजयानंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये तो आपण खूप थकल्याचे सांगताना दिसत आहे.

मी थकलोय यार …

खरंतर सामना संपल्यानंतर विराट कोहली विमानतळावर पोहोचला तेव्हा त्याला चाहत्यांनी आणि पापाराझींनी घेरले होते. फोटो काढण्यासाठी सगळे त्याच्या आगेमागे फिरू लागले. पण तो काही फोटो देण्याच्या मूडमध्ये नव्हता. आत्ताच खेळून आलोय, थकलोय मी असं सांगत विराटने फोटोसाठी नकार दिला आणि तो थेट कारमध्ये बसून निघून गेला.

मात्र, या व्हिडिओमध्ये केएल राहुलही दिसत होता. तो विराटच्या पुढेच चालत विमनतळावरून निघाला, पण तो जेवढ्या शांतपणे निघून जाऊ शकला, तसं विराटच्या बाबतीत घडलं नाही. विराट येताच सर्वांनी त्याला गराडा घातला. फोटो काढण्यासाठी त्याच्यासमोर एकच झुंबड उडाली.

 

चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी विराटकडून अपेक्षा

चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 लवकरच सुरू होणार असून यामध्ये भारतला विराट कोहलीकडून बरीच अपेक्षा आहे. त्याची बॅट तळपली तर टीम इंडिया विजेतेपद मिळवू शकते हे सर्वांनाच माहीत आहे. मात्र आयसीसी स्पर्धेतील विराट कोहलीचा खराब फॉर्म चिंतेचा विषय बनला आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या एकदिवसीय सामन्यात 55 चेंडूत 52 धावांची खेळी केली. पण विराटला त्याचा फॉर्म सापडला आहे का? , असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. हे सध्या तरी सांगणे कठीण आहे. विराट कोहलीने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील 2 सामन्यात 57 धावा केल्या आहेत, त्यापैकी 52 धावा फक्त एका सामन्यात केल्या आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताचा पहिला सामना 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध आहे, ज्यासाठी टीम इंडिया लवकरच दुबईला रवाना होणार आहे. भारताला चॅम्पियन्स ट्रॉफीचे सर्व सामने दुबईतच खेळायचे आहेत.