मध्यप्रदेश प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम उद्यापासून, महानआर्यमन सिंधियांनी दिल्या शुभेच्छा

मध्य प्रदेश प्रीमियर लीग (MPL) चा दुसरा रोमांचकारी हंगाम उद्यापासून ग्वाल्हेर येथील श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये सुरू होत आहे. उद्घाटन सोहळ्यात WWE स्टार द ग्रेट खली उपस्थित राहणार आहेत. तिकिटे फक्त ५० रुपयांना District ॲपवर उपलब्ध आहेत

मध्यप्रदेश प्रीमियर लीगचा दुसरा हंगाम उद्यापासून, महानआर्यमन सिंधियांनी दिल्या शुभेच्छा
madhya pradesh league
| Updated on: Jun 11, 2025 | 8:39 PM

क्रिकेटप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. क्रिकेटमध्ये नवचैतन्य आणणारा आणि संपूर्ण राज्याला क्रिकेटची नवी ओढ लावणारा ‘मध्य प्रदेश प्रीमियर लीग’ (MPL) चा दुसरा सीझन उद्यापासून सुरू होत आहे. या वर्षीचे सर्व सामने ग्वाल्हेरमधील नव्याने बांधलेल्या श्रीमंत माधवराव सिंधिया क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. या दुसऱ्या हंगामातील पहिला सामना उद्या सायंकाळी ७:३० वाजता ‘ग्वाल्हेर चीताज’ आणि ‘चंबळ घड़ियाल्स’ यांच्यात होणार आहे.

भव्य उद्घाटन सोहळ्याचे आयोजन

या हंगामातील पहिल्या दिवसाच्या सामन्यापूर्वी एक भव्य उद्घाटन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी WWE चे प्रसिद्ध पैलवान द ग्रेट खली यांना प्रमुख पाहुणे म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. हा उद्घाटन सोहळा संध्याकाळी ६.३० वाजता सुरु होईल.

एका तिकिटाची किंमत फक्त ५० रुपये

या लीगमधील सामन्यांची तिकिटे District ॲपवर ऑनलाईन खरेदी करता येतील. या सामन्याच्या एका तिकिटाची किंमत फक्त ५० रुपये ठेवण्यात आली आहे. या लीगच्या सामन्यांचे अधिकृत प्रसारण हक्क ‘जिओ हॉटस्टार’कडे आहेत. त्यामुळे चाहते हे सामने स्टार स्पोर्ट्सवर थेट टीव्हीवर आणि जिओहॉटस्टारवर ऑनलाइन पाहू शकतील.

महानआर्यमन सिंधिया यांनी दिल्या शुभेच्छा

मध्य प्रदेश क्रिकेट लीगच्या गव्हर्निंग कौन्सिलचे अध्यक्ष महानआर्यमन सिंधिया यांनी MPCA, GDCA, MPL आणि MPL च्या १० संघांतील खेळाडू तसेच सर्व सदस्यांना लीगबद्दल शुभेच्छा दिल्या आहेत. “गेल्या पर्वापेक्षा आमचे MPL कुटुंब आता अधिक मोठे झाले आहे. आम्ही गेल्या वर्षापेक्षा मोठे यश संपादन करू. देशातील सर्वोत्तम राज्य लीग बनणे हेच आमचे उद्दिष्ट आहे. यासाठी आम्ही सातत्याने काम करत राहू. ग्वाल्हेर आणि संपूर्ण मध्य प्रदेशच्या जनतेने सामन्यांचा पूर्ण आनंद घ्यावा. तसेच या क्रिकेट लीगसाठी शुभेच्छा, असे  महानआर्यमन सिंधिया यांनी म्हटले.