
टीम इंडियाचा स्टार फलंदाज रोहित शर्माने दमदार पुनरागमन केलं. विजय हजारे ट्रॉफीमध्ये त्याने शानदार शतक झळकावलं. सिक्किम विरुद्ध टुर्नामेंटच्या पहिल्या सामन्यात रोहितने 155 धावा कुटल्या. दुसऱ्या सामन्यातही रोहितकडून अशाच फलंदाजीची अपेक्षा होती. पण रोहित त्याच्या लाखो चाहत्यांच्या अपेक्षा पूर्ण करु शकला नाही. कारण हिटमॅनला मागच्या सामन्यासारखी कमाल करता आली नाही. उत्तराखंड विरुद्ध दुसऱ्या सामन्यात रोहित गोल्डन डक म्हणजे पहिल्या चेंडूवर खातं न उघडताच आऊट झाला. जयपूरमध्ये 24 डिसेंबर टुर्नामेंट सुरु झाली. पहिल्याच सामन्यात रोहितने तुफानी बॅटिंग केली. त्याने फक्त 62 चेंडूत शतक झळकावलं. 94 चेंडूत एकूण 155 धावा केल्या. रोहितने आपल्या इनिंगमध्ये 18 चौकार आणि 9 षटकार लगावले. जयपूरच्या सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये जवळपास 20 हजार प्रेक्षकांनी रोहितची ही तुफानी बॅटिंग पाहिली.
रोहितकडून दुसऱ्या सामन्यात अशाच फलंदाजीची अपेक्षा करुन हजारो क्रिकेट प्रेमी सवाई मानसिंह स्टेडिअममध्ये पोहोचले. मुंबईच्या टीमने पहिली फलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांचा आनंद अधिकत द्विगुणित झाला. रोहितच्या बॅटिंगसाठी फॅन्सना मागच्या सामन्यासारखी वाट पहावी लागली नाही. पण हा आनंद फार काळ टिकला नाही. अवघ्या 6 चेंडूच्या आत खेळ संपला. इनिंगच्या पहिल्या ओव्हरमधील सहाव्या चेंडूवर रोहित शर्मा स्ट्राइकवर आला. येताच त्याने पुल शॉट मारला. पण त्याला यश मिळालं नाही. पहिल्याच चेंडूवर खात न उघडताच रोहित पॅव्हेलियनमध्ये परतला. उत्तराखंडचा वेगवान गोलंदाज देवेंद्र बोराला हा मोठा विकेट मिळाला.
Rohit Sharma’s catch was almost dropped by the fielder, but he held on to it on the second attempt.😢💔 pic.twitter.com/Fcb1965xfW
— 𝐑𝐮𝐬𝐡𝐢𝐢𝐢⁴⁵ (@rushiii_12) December 26, 2025
थंडीत सकाळी 6 वाजता चाहते स्टेडिअम बाहेर
रोहितचा खेळ पाहण्यासाठी चाहते खूप उत्सुक होते. पहिल्या सामन्यातील खेळ आणि त्यातील रोहितच्या प्रदर्शनामुळे दुसऱ्या मॅचसाठी खूप उत्साह होता. त्यामुळेच राजस्थान क्रिकेट असोशिएशनने दोन स्टँड अजून उघडण्याचा निर्णय घेतला. कडाक्याच्या थंडीत सकाळी 6 वाजता चाहते स्टेडिअम बाहेर पोहोचले होते. पण पुढच्याच चेंडूत रोहित आऊट झाल्याने त्यांची निराशा झाली. आगमी 2027 च्या वनडे वर्ल्ड कप टीममध्ये रोहित शर्माच्या समावेशासाठी त्याचा फॉर्म महत्वाचा आहे. म्हणून त्याला आणि विराट कोहलीला बीसीसीआयकडून देशांतर्गत स्पर्धांमध्ये खेळायला सांगितलं आहे.