Sunil Gavaskar : सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय, सुनील गावस्करांनी हेड कोच गौतम गंभीरला सुनावलं

Sunil Gavaskar : सुनील गावस्कर हे रोखठोक बोलण्यासाठी ओळखले जातात. काल भारताने अफगाणिस्तावर 300 धावांनी मोठा विजय मिळवला. पण गावस्करांनी त्याबद्दल जास्त बोलण्याऐवजी टीम इंडियाला वास्तवाची जाणीव करुन दिली.

Sunil Gavaskar :  सतत परिवर्तन, परिवर्तन काय लावलय, सुनील गावस्करांनी हेड कोच गौतम गंभीरला सुनावलं
Sunil Gavaskar
Image Credit source: PTI
| Updated on: Jun 09, 2026 | 11:29 AM

चंदीगडमध्ये काल भारताने अफगाणिस्तानवर मोठा विजय मिळवला. एक डाव आणि 300 धावा, कसोटी क्रिकेटमधील एका मोठ्या विजयाची भारताने नोंद केली. पण दिग्गज क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांच्या मते संघाची जी मोठी चिंता आहे, त्यावर अजून उत्तर सापडलेलं नाही. भारताचा कसोटी क्रिकेट संघ परिवर्तनाच्या अवस्थेत आहे, हे मान्य करायला त्यांनी नकार दिला. भारताचे हेड कोच गौतम गंभीर आणि कसोटी कर्णधार शुबमन गिल सतत हेच वाक्य बोलतात. भारताच्या वरिष्ठ क्रिकेटपटूंनी कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्यानंकर मागच्या काही कसोटी मालिकांमध्ये टीम इंडियाच्या प्रदर्शनात घसरण झाली आहे. चंदीगड येथील कसोटी सामना भारतीय संघाने तीन दिवसात संपवला.

“प्रत्येक टीममध्ये काही व्यक्तीगत बदल होत असतात. भारताचं सर्व लक्ष हे परिवर्तनापेक्षा चांगल्या परफॉर्मन्सवर असलं पाहिजे” असं सुनील गावस्कर म्हणाले. ते जिओ हॉटस्टारवर बोलत होते. “टीम आता परिवर्तनाच्या अवस्थेत आहे हे जे काही सतत सांगितलं जातं, ते मागे सोडून कसोटी क्रिकेटमध्ये ज्या दर्जाची अपेक्षा आहे, त्यावर लक्ष दिलं पाहिजे” असं सुनील गावस्कर म्हणाले. “प्रत्येक टीमला निवृत्तीला सामोर जावं लागतं, काही व्यक्तीगत बदल होतात पण परफॉर्मन्सवर लक्ष असलं पाहिजे” असं सुनील गावस्कर म्हणाले.

विजयाबद्दल त्यांनी जास्त बोलणं टाळलं

गंभीर यांच्या कार्यकाळात मायदेशात कसोटी मालिकेत न्यूझीलंड, दक्षिण आफ्रिकेकडून झालेल्या पराभवाचा त्यांनी उल्लेख केला. फलंदाजी टीमची मुख्य चिंता असल्याचं गावस्कर म्हणाले. अफगाणिस्तान विरुद्ध मिळवलेल्या विजयाबद्दल त्यांनी जास्त बोलणं टाळलं. अफगाणिस्तान विरुद्ध भारताने पहिल्या डावात 8 बाद 564 धावांचा डोंगर उभारला. कॅप्टन शुबमन गिल, केएल राहुल यांनी शतकी खेळी केल्या. ऋषभ पंत, साई सुदर्शन आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी अर्धशतकं झळकावली.

फलंदाजांबद्दल गावस्कर काय बोलले?

“अलीकडच्या कसोटी मालिकांमधील भारताच्या कामगिरीकडे बघितलं तर लक्षात येईल की, गोलंदाजी पेक्षा फलंदाजीची मुख्य चिंता आहे. गोलंदाज त्यांचं काम चोख बजावत आहेत. पण फलंदाजांना खासकरुन आव्हानात्मक स्थितीत जास्त शिस्त आणि उत्तम तंत्र दाखवावं लागेल” असं गावस्कर म्हणाले. क्रिकेटच्या मोठ्या फॉर्मेटमध्ये टी20 च्या सवयींवरुनही गावस्कर यांनी इशारा दिला.

ही चुकीची पद्धत आहे

“काही चेंडू निर्धाव खेळल्यानंतर संयम ठेवणं कठीण होऊन बसतं. मग, अशावेळी फलंदाजाला टी20 च्या मानसिकतेत जाण्याची सवय असते. ही चुकीची पद्धत आहे. कसोटी क्रिकेट खेळताना एक वेगळा दृष्टीकोन लागतो. भारतीय फलंदाजांनी मोठ्या इनिंग खेळण्यावर भर द्यावा. प्रत्येक निकालाकडे परिवर्तनाच्या दृष्टीकोनातून पाहण्यापेक्षा वर्तमानावर लक्ष द्या” असा सल्ला गावस्कर यांनी दिला.

Follow Us