अतिवृष्टीने मारलं, तरीही संकटाला गाढलं, इंदापूरच्या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीतून 6 लाख कमावले

| Updated on: Jan 06, 2021 | 4:29 PM

भागवत राऊत यांनी कष्ट आणि औषधांची फवारणी करत टोमॅटोच्या शेतीत लाखोंचं उत्पन्न घेतलं आहे. Bhagwat Raut Tomato farming

अतिवृष्टीने मारलं, तरीही संकटाला गाढलं, इंदापूरच्या शेतकऱ्याने टोमॅटो शेतीतून 6 लाख कमावले
भागवत राऊत यांनी टोमॅटो शेतीतून नफा मिळवलाय
Follow us on

पुणे: जिल्ह्यातील इंदापूर (Indapur) तालुक्यातील सरडेवाडी (Saradewadi) येथील भागवत राऊत (Bhagwat Raut)यांच्या कुटुंबांना टोमॅटो शेतीतून मोठा फायदा झाला आहे. 14 ऑक्टोबरला झालेल्या अतिवृष्टीत मोठ्या प्रमाणात टोमॅटो पिकाचे नुकसान झाले होते. मात्र, अपार कष्ट मेहनत घेत व योग्य ती औषधांची फवारणी करत राऊत कुटुंबांनं टोमॅटोच्या शेतीत लाखोंचं उत्पन्न घेतलं आहे. ( Bhagwat Raut earn six lakh rupees from Tomato farming at Saradewadi of Indapur)

टोमॅटो लागवडीनंतर महिनाभरातच अतिवृष्टीचा फटका

पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी नजीक भागवत राऊत यांच्या कुटुंबाची नऊ एकर जमीन आहे. या जमिनीपैकी दीड एकरात ते दरवर्षी टोमॅटो पिकाची लागवड करत असतात. 20 सप्टेंबर 2020 रोजी त्यांनी दीड एकरात टोमॅटो पिकाची लागवड केली. शेतीची मशागत करत दीड एकरात त्यांनी बेड काढत मल्चिंग पेपरचा वापर केला. ठिबक सिंचन वापरत बारा ते तेरा हजार रोपांची लागवड केली. मात्र, लागवड केल्यानंतर महिन्याभरातच म्हणजे 14 ऑक्टोंबरला झालेल्या अतिवृष्टीमुळे त्यांच्या या शेताचे खूप मोठे नुकसान झाले. पण भागवत राऊत आणि त्यांच्या कुटुंबानं हार मानली नाही. राऊत यांनी टोमॅटो शेतीच्या दीड एकरात कुटुंबाने अपार मेहनत व कष्ट करत तसेच योग्य त्या औषधांची फवारणी करून दीड एकर टोमॅटोची शेती पुन्हा फुलविली.

भागवत राऊत कुटुंबातील सदस्य असलेले सचिन हेगडे यांच्या सल्ल्याने टोमॅटो पिकात औषधाची फवारणी केली. सचिन हेगडे हे राऊत कुटुंबातील सदस्य असून तेही या टोमॅटोच्या शेती मोठे कष्ट घेत आहेत. अतिवृष्टीत सापडलेल्या या पिकाला बुरशी रोगाने ग्रासले होते. सचिन हेगडे यांनी यावरती ऑरगॅनिक औषधे जास्त प्रमाणात वापरले व रासायनिक औषधांचा अल्प प्रमाणातच वापर करुन टोमॅटो शेती पूर्व स्थितीत आणली.

टोमॅटोच्या भावात चढ- उतार

लागवडी नंतर अडीच महिन्यानंतर पहिला तोडा सुरू झाला. पहिल्या तोड्यावेळी 200 कॅरेटच्या आसपास माल निघू लागला. आज पर्यंत सहा तोडे झालेले असून मुंबईचे व्यापारी त्यांच्या शेतात येऊन हा माल घेऊन जात आहेत. पहिल्यांदा एका कॅरेटला एक हजार रुपयांचा भाव मिळत होता. हळूहळू कमी होत सध्या पाचशे ते सहाशे रुपयांच्या आसपास भाव मिळत आहे. टोमॅटोचा भाव कमी-जास्त होत आहे. आजपर्यंत 6 तोडे झाले असून तेराशे पन्नास पेटी माल राऊत यांनी विकलेला आहे.

आत्तापर्यंत भागवत राऊत यांना एकूण खर्च दीड लाखापर्यंत झालेला असून साडेसहा लाख रुपये या टॉमेटोचा शेतीतून त्यांना मिळाले आहेत. टोमॅटोचा दर सध्या आहेत तसाच कायम राहिला तर आणखी एका महिन्यात त्यांना अडीच लाख मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एकूण खर्च वजा जाता त्याना सहा लाखांचा निव्वळ नफा होणार आहे.

संबंधित बातम्या:

डोकं लावून शेती केली, 500 एकरवर कोथिंबीर पिकवली, 90 दिवसात लाखो कमावले!

नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं

( Bhagwat Raut earn six lakh rupees from Tomato farming at Saradewadi of Indapur)