Ujani Dam : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग अटोक्यात, नदी लगतच्या पिकांना जीवदान

| Updated on: Aug 17, 2022 | 3:07 PM

उजनी धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हे धरण 100 टक्के भरले होते. त्यामुळे 13 ऑगस्टपासून धरणातून तब्बल 61 हजार 600 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचे नुकसान सुरु झाले होते. यंदा जुलै पाठोपाठ ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांची स्थिती हीच आहे.

Ujani Dam : उजनी धरणातून पाण्याचा विसर्ग अटोक्यात, नदी लगतच्या पिकांना जीवदान
उजनी धरण
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

इंदापूर : उजणी धरणाच्या (Rise in water level) पाणीपातळीत वाढ झाल्याने गत आठवड्यात (Discharge of water) पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला होता. त्यामुळे भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. एवढेच नाहीतर पंढरपुरातील मंदिरेही पाण्याखाली गेली होती. दिवसेंदिवस धोका वाढत असताना मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग हा 10 हजार क्युसेकने कमी करण्यात आला आहे. अवघ्या 4 दिवसांमध्येच हा विसर्ग कमी करण्यात आल्याने नागरिकांना तर दिलासा मिळाला आहेच पण खरीप हंगामातील पिकांचे नुकसानही टळलेले आहे. (Dam Water) धरणातील पाणी पातळीचा अंदाज घेऊन हा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतलेला आहे. त्यामुळे सोलापूर, पंढरपूर, माढा या तालुक्यातील ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे.

10 क्युसेकने विसर्ग कमी

उजनी धरण क्षेत्रात सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस झाल्याने हे धरण 100 टक्के भरले होते. त्यामुळे 13 ऑगस्टपासून धरणातून तब्बल 61 हजार 600 क्युसेक्स एवढा विसर्ग सुरु करण्यात आला होता. त्यामुळे नदीकाठच्या शेतीपिकाचे नुकसान सुरु झाले होते. यंदा जुलै पाठोपाठ ऑगस्टमध्येही सरासरीपेक्षा अधिकचा पाऊस होत आहे. त्यामुळे राज्यातील धरणांची स्थिती हीच आहे. पावसाची उसंत आणि धरणात पाण्याची होणारी आवक कमी असल्याने विसर्ग कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. उजनी धरणातून भीमा नदीत 51600 क्युसेक्स ने पाणी सोडण्यात येते आहे.

खरीप पिकांचे नुकसान टळले

हंगामाच्या सुरवातीपासून खरीप पिकांना धोका निर्माण झाला होता. जुलैमध्ये अधिकच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले तर आता पावसाने उघडीप दिली असली तरी धरणातील पाणी थेट शेत शिवारात घुसत आहे. पिकांमध्ये पाणी साचत असल्याने पिकांची वाढ तर खुंटली आहेच पण भविष्यात उत्पादनावरही त्याचा परिणाम होणार आहे. मात्र, मंगळवारपासून पाण्याचा विसर्ग कमी करण्यात आल्याने नुकसान टळणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

राज्यातील सर्वच धरणांमध्ये पाणीसाठा

राज्यात जुलै आणि या महिन्यात चांगला पाऊस पडलाय, त्यामुळे राज्यातील धरणे 77.66 टक्के भरली आहेत. सरासरीच्या तुलनेत कोकण विभागातील धरणामध्ये 89 टक्के पाणीसाठा तर पुणे विभागातील धरणांत 83 टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे. नागपूर विभागात धरणांमध्ये 71.47 टक्के पाणीसाठा आहे. राज्यातील धरणांमध्ये पुरेसा पाणीसाठा असल्याने, पिण्याच्या पाण्याची आणि काही भागात शेतीच्या पाण्याचीही चिंता मिटली आहे.