गायी गुरांनाही विकली ऑफ असावा का हो? ‘या’ गावात देतात, 100 वर्षांपासूनची परंपरा!

माणसांप्रमाणेच गायी-गुरांनाही साप्ताहिक सुटी असावी, असा विचार आपण केलाही नसेल. पण या गावातील लोकांनी 100 वर्षांपूर्वीच हा विचार केला आणि तशी परंपराही सुरु केली.

गायी गुरांनाही विकली ऑफ असावा का हो? या गावात देतात, 100 वर्षांपासूनची परंपरा!
Image Credit source: tv9 marathi
| Updated on: Apr 05, 2023 | 2:40 PM

नवी दिल्ली : माणसांच्या जगात दररोज कष्ट करणाऱ्या किंवा नोकरीवर जाणाऱ्या लोकांना एक दिवस साप्ताहिक सुटी मिळावी, असा नियम आहे. पण प्राण्यांच्याही जगाचा असा कुणी विचार केलाय का? किंबहुना माणसांच्या गरजांसाठी ज्या प्राण्यांना महिनाभर जुंपलं जातं, त्यांच्या आरोग्याचा कुणी विचार केलाय का.. त्यांना नसेल का साप्ताहिक सुटीची गरज? आपल्यापैकी अनेकांनी केला नसेल हा विचार. पण झारखंडमधील एक दोन नव्हे तर २० पेक्षा जास्त गावांनी हा विचार केलाय. तोसुद्धा आता नव्हे तर तब्बल १०० वर्षांपूर्वी.

कुठे दिला जातो विकली ऑफ?

झारखंड राज्यातील लातेहार जवळील जवळपास २० पेक्षा जास्त गावांमध्ये ही अनेक वर्षांपासूनची परंपरा आहे. इथे गाय-बैल किंवा इतर जनावरांकडून रविवारी काम करून घेतलं जात नाही. त्या दिवशी त्यांचा विकली ऑफ समजा. विश्रांती दिली जाते. आठवडाभराचा थकवा घालवण्यासाठी, त्यांना ताजंतवानं होण्यासाठी..

अनेक जन्मांपासूनचं नातं…

लातेहारमधील गावकऱ्यांच्या मते, मनुष्य आणि प्राण्यांच अनेक जन्मांपासूनचं नातं आहे. भारतीय संस्कृतीत याचे अनेक दाखले आहेत. आपले अनेक सण-उत्सवदेखील पशु-प्राण्यांशी जोडलेले आहेत. गायी-गुरांच्या मेहनत आणि सहकार्यामुळेच जगात माणसांची भूक भागली जाते. त्यामुळे एवढी मेहनत घेणाऱ्या गायी गुरांना आठवड्यातून एक दिवस सुटी दिलीच पाहिजे. लातेहार जिल्ह्यातील हरखा, मोंगर, ललगडी आणि पकरारसह इतर अनेक गावांमध्ये ही परंपरा पाळली जाते.

गरज पडल्यास माणसं कामाला जुंपतात..

लातेहार येथील गावकऱ्यांनी सांगितलं की, माणसांना आठवड्यातून एक दिवस आराम नाही मिळाला तर ते आजारी पडतात. त्याचप्रमाणे प्राण्यांनाही जणाव जाणवतो. त्यांना आराम दिला नाही तर ते आजारी पडतात. त्यामुळे आमच्या गावातील ही परंपरा खरोखरच चांगली आहे. रवविारी अनेक ग्रामीण भागात जनावरांना सुटी दिली जाते. गरज पडली तर मासे स्वतः नांगर चालवतात. पण आठवड्यातून एक दिवस कोणत्याही स्थितीत जनावरांना कामाला जुंपत नाहीत.

कधीपासून सुरुवात?

जनावरांना साप्ताहिक सुटी देण्याची या गावांमधली परंपरा १०० वर्षांपूर्वीची आहे. अके दिवशी नांगराला जुंपत असतानाच एका बैलाचा मृत्यू झाला होता. हा मृत्यू का झाला, यावर पंचायत बसली. गरजेपेक्षा जास्त थकवा आणि कामाच्या ताणामुळे बैल मरण पावला, असं कारण पुढे आलं. त्यानंतर येथील पंचायतीने आठवड्यातून एक दिवस जनावरांना सुटी देण्याचा एकमताने निर्णय घेतला. तेव्हापासून ही परंपरा अखंडपणे सुरु आहे.