शेतकऱ्यांना भरली गारपिटीची धडकी, राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या हवामानात होणार मोठा बदल, जाणून घ्या

| Updated on: Mar 15, 2023 | 4:08 PM

राज्यातील शेतकऱ्यांसामोर आता पुन्हा एकदा नवं संकट उभं राहिले आहे. पुढील तीन दिवस राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये गारपीट आणि अवकाळी पाऊस पडणार आहे.

शेतकऱ्यांना भरली गारपिटीची धडकी, राज्यातील कोणत्या जिल्ह्याच्या हवामानात होणार मोठा बदल, जाणून घ्या
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : राज्यातील शेतकऱ्यांवरील संकटाची मालिका काही केल्या कमी व्हायचं नाव घेत नाहीये. आता पुन्हा एकदा राज्यातील कोकण आणि मुंबई भाग वगळून इतर ठिकाणी अतिवृष्टी ते गारपिटीचा अंदाज वर्तवण्यात आलेला आहे. त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांसमोरील अवकाळी पावसाच संकट आणि गारपिटीचा संकट अजूनही टळलेलं नाहीये. गेल्या आठवड्यात नाशिकसह आठ जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला होता काही ठिकाणी गारपीटही झाली होती. त्यामुळे कांदा, द्राक्ष, केळी, हरभरा आणि गहू यांसह नगदी पीके आणि भाजीपाला यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. काही ठिकाणी गारपीट झाल्याने मोठा आर्थिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे.

राज्यात गेल्या आठवड्यातही अवकाळी पाऊस आला होता. त्यामध्ये आठ जिल्ह्याला अवकाळी पावसाचा फटका बसला होता. त्यामध्ये चिंतेची बाब म्हणजे काही ठिकाणी गारपीठ झाली होती. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणात दर कोसळले आहे.

यामध्ये गव्हाची स्थितीही चिंताजनक असून कांद्यावर करपा रोग येण्याची शक्यता आहे. असे असतांना शेतकऱ्यांसमोर पुन्हा अवकाळी पाऊस आणि गारपीटीचे संकट निर्माण झाले आहे. उद्यापासूनचे पुढील तीन दिवस 13 जिल्ह्यात गारपीट होण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा

आधीच अस्मानी संकट आणि सुलतानी संकटाने शेतकरी हवालदिल झालेला असताना आता पुन्हा एकदा गारपिटीचा पाऊस येणार असल्याने हातातोंडाशी आलेला घास कायमचा मातीमोल होणार आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी खरीप आणि रब्बी अशी दोन्हीही पिके शेतकऱ्यांच्या हातातून जाणार हे जवळपास निश्चित मानले जात आहे.

पुढील तीन दिवसांत राज्यातील 13 जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याचा अंदाज हवामान विभागाच्या वतीने वर्तविण्यात आलेला आहे. यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून हाती असलेलं पीक कसं वाचवायचं असा यक्ष प्रश्न उभा राहिला आहे.

बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. त्यामुळे देशातील काही राज्यांना अवकाळी पावसाचा आणि गारपिटीचा फटका बसणार आहे. यामध्ये महाराष्ट्र राज्याचा काही भाग असल्याने शेतकऱ्यांना त्याचा फटका बसत आहे. पुढील तीन दिवस शेतकऱ्यांसाठी धोक्याचे आहेत.

मध्य महाराष्ट्रासह उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक तसेच विदर्भात गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, मराठवाड्यात उस्मानाबाद, लातूर, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा धोका आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसाठी पुढील तीन दिवस चिंतेचे असणार आहे.