Kharif Season : तयारी पूर्ण आता पावसाची प्रतिक्षा, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग

| Updated on: May 24, 2022 | 2:58 PM

कृषी विभागाचे नियोजन आणि उन्हाळी हंगामात सोयाबीनचा वाढलेला पेरा यामुळे यंदा सोयाबीन बियाणांचा तर तुटवडा भासणार नाही. असे असतानाही महाबीजने यंदा दरात वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, घरच्या बियाणांमधून अपेक्षित उतारा पडत नाही त्यामुळे शेतकरी हे विकत्या बियाणांवरच भर देत आहेत.

Kharif Season : तयारी पूर्ण आता पावसाची प्रतिक्षा, बी-बियाणे खरेदीसाठी शेतकऱ्यांची लगबग
Image Credit source: TV9 Marathi
Follow us on

लातूर : यंदा (Rain) पावसाचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनी (Pre-Kharif) खरीपपूर्व शेती मशागतीची कामे आटोपून घेतली आहेत. गतवर्षी झालेले नुकसान यंदा भरुन काढण्यासाठी शेतकऱ्यांनी सर्वतोपरी तयारी केली आहे. पाऊस पडल्यानंतर (Seeds) बी-बियाणांचा तुटवडा भासेल म्हणून शेतकरी आता बी-बियाणे खरेदीवर भर देत आहेत. शेतकऱ्यांनी सर्व तयारी केली असली तरी पुरेसा पाऊस झाल्याशिवाय चाढ्यावर मूठ ठेऊ नये असे अवाहन कृषी विभागाच्या माध्यमातून करण्यात आले आहे. यंदाच्या हंगामातही सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भर राहणार आहे. सोयाबीनचीच उत्पादकता वाढविण्यावर शेतकऱ्यांचा कल असून राज्यात 46 लाख हेक्टरावर पेरा होणार असल्याचा अंदाज यापूर्वीच कृषी विभागाने वर्तवला आहे.

बियाणांची चिंता मिटली, खताची धास्ती कायम

कृषी विभागाचे नियोजन आणि उन्हाळी हंगामात सोयाबीनचा वाढलेला पेरा यामुळे यंदा सोयाबीन बियाणांचा तर तुटवडा भासणार नाही. असे असतानाही महाबीजने यंदा दरात वाढ केली आहे. त्यामुळे उत्पादकता वाढवण्यासाठी आणि अधिकचा खर्च टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी घरच्या बियाणांवर भर देण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे. मात्र, घरच्या बियाणांमधून अपेक्षित उतारा पडत नाही त्यामुळे शेतकरी हे विकत्या बियाणांवरच भर देत आहेत. तर दुसरीकडे खताच्या दरात वाढ झाली नसली तरी तुटवडा भासल्यानंतर विक्रेत्ये काय भूमिका घेतात हे पहावे लागणार आहे.

यंदा सर्वकाही वेळेवर, वाढीव उत्पादनासाठी प्रयत्न

उन्हाळी हंगामातील पिकांची काढणी झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामपूर्व मशागतीसाठी पुरेसा वेळ मिळाला होता. त्यामुळे नांगरण, मोगडणी आणि कोळपणी ही कामे पूर्ण झाली आहेत. शिवाय यंदा मान्सूनचे आगमन वेळेपूर्वीच होणार असल्याने शेतकऱ्यांनी शेती कामे उरकण्यावर भर दिला होता. आता मृग नक्षत्रामध्ये पावसाने हजेरी लावली तर वेळेत पेरण्या देखील होतील. खरिपात पेरण्या वेळेवर झाल्या तर उत्पदनात वाढ होते असे कृषी विभागाचे म्हणणे आहे. त्यामुळे गतवर्षी झालेली परवड आणि नुकसान हे दोन्हीही यंदा भरुन काढण्याची संधी शेतकऱ्यांकडे राहणार आहे.

हे सुद्धा वाचा

सोयाबीनवरच भर, पीक पध्दतीमध्येही बदल

यंदा कापसाला विक्रमी दर मिळाला असला तरी मराठवाड्यात सोयाबीनवरच शेतकऱ्यांचा भऱ राहणार आहे. वाढत्या दरामुळे कापसाचे क्षेत्र वाढणार असे अंदाज वर्तवले जात होते पण मराठवाड्यातून परभणी आणि हिंगोली वगळता इतर जिल्ह्यांमध्ये कापसाचे पीक घेतले जात नाही. त्यामुळे सोयाबीनचेच क्षेत्र वाढणार असून उत्पादनवाढीसाठी बीबीएफ, टोकण पध्दतीने पेरणी करण्यावर भर दिला जाणार आहे. यासाठी कृषी विभागाकडूनही जनजागृती केली जात आहे. या सर्व बाबींचे फलीत यंदाच्या खरीप हंगामात पाहवयास मिळणार आहे.