सोयाबीनचे दर वाढले मात्र आवक कमीच, शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय?

| Updated on: Nov 16, 2021 | 5:47 PM

सलग सहा दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. 4800 रुपये प्रति क्विंटलचा दर आता 5600 वर येऊन ठेपलेला आहे. असे असतानाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढत नाही. विशेष म्हणजे पावसाने सोयाबीनचा दर्जा ढासळला असतानाही शेतकरी हा साठवणूकीवर भर देत आहे.

सोयाबीनचे दर वाढले मात्र आवक कमीच, शेतकऱ्यांच्या मनात आहे तरी काय?
संग्रहीत छायाचित्र
Follow us on

लातूर : सलग सहा दिवसांपासून सोयाबीनच्या दरात वाढ होत आहे. 4800 रुपये प्रति क्विंटलचा दर आता 5600 वर येऊन ठेपलेला आहे. असे असतानाही बाजारपेठेत सोयाबीनची आवक वाढत नाही. विशेष म्हणजे पावसाने सोयाबीनचा दर्जा ढासळला असतानाही शेतकरी हा साठवणूकीवर भर देत आहे. दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घट होती. पण दिवाळीनंतर बाजारपेठेतले चित्र बदलेले आहे. मात्र, शेतकऱ्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे याचा अंदाज व्यापाऱ्यांनाही बांधता येत नाही. कारण गतवर्षी दिवाळीनंतर लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये 50 ते 60 हजार क्विंटलची आवक होत होती. पण आता दर वाढूनही 25 हजार पोत्यांची आवक होत आहे.

सोयाबीन या मुख्य पिकावरच शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असते. यंदा मात्र, मुहूर्ताचा दर वगळता सोयाबीनच्या दरात कायम घटच झालेली आहे. त्यामुळे साठवणूकीवर शेतकऱ्यांनी भर दिलेला होता. आता दर वाढल्यानंतर का होईना आवक वाढणार असा अंदाज होता. मात्र, दरवाढीचा आज सहावा दिवस असतानाही लातूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये केवळ 25 हजार पोत्यांचीच आवक होती. त्यामुळे शेतकऱ्यांच्या मनात नेमके काय सुरु आहे हा प्रश्न आहे.

आठ दिवसामध्ये 800 रुपयांनी वधारले सोयाबीन

दिवाळीपूर्वी सोयाबीनच्या दरात कमालीची घसरण झाली होती. शिवाय दिवसाकाठी दर हे घटतच होते. त्यामुळे दिवाळीनिमित्त बाजारपेठा बंद होण्यापूर्वी सोयाबीन हे 4800 वर येऊन ठेपले होते. मात्र, दिवाळीनंतर सोयाबीनच्या दरात कायम सुधारणा झाली आहे. 4800 वर असलेले सोयाबीन आता 5600 वर येऊन ठेपले आहे. शिवाय पावसामुळे सोयाबीन खराब झाले असतानाही दरात वाढ होत आहे हे विशेष.

शेतकऱ्यांना अपेक्षा दरवाढीची

हंगामाच्या सुरवातीला सोयाबीनच्या दरात मोठ्या प्रमाणात घट झाल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. गतवर्षी सोयाबीन हे 10 हजार रुपये प्रति क्विंटलने विकले होते तर यंदा दर थेट 4800 वर येऊन ठेपले होते. त्यामुळे शेतकऱ्यांनी साठवणूकीवरच भर दिलेला होता. आता दरात वाढ झाली असली तरी शेतकऱ्यांच्या अपेक्षा ह्या वाढलेल्या आहेत. सोयाबीनला किमान 8 हजाराचा दर मिळाला तरच हे पिक परडणार आहे. यंदा बियाणे, खत आणि पिक जोपासण्यावर अधिकचा खर्च झाला आहे. त्यामुळे अणखीन दर वाढल्याशिवाय सोयाबीनची विक्री न करण्याच्या मानसिकतेमध्ये शेतकरी आहेत.

गरजेनुसार वाढणार आवक : अशोक आग्रवाल

सध्या दिवाळी सण झालेला आहे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई आणि पिक विम्याचे पैसेही मिळालेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना लागलीच सोयाबीनच्या विक्रीची आवश्यकता नाही. रब्बी हंगामातील पेरण्याही उरकत्या झाल्या आहेत. शेतकऱ्यांना आर्थिक टंचाई भासत नसल्याने शेतकरी सोयाबीनची साठवणूक करीत आहे. शिवाय मागणीनुसार भविष्यातही सोयाबीनचे दर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. त्यामुळे गरज पडली तरच सोयाबीनची शेतकरी विक्री करणार आहेत. मात्र, काही दिवासांनी सोयाबीनची आवक वाढणार आहे.

संबंधित बातम्या :

खरेदीखत म्हणजे काय? त्यासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे..!

गव्हाचा पेरा झाला अन् ग्राहकही ठरले, औरंगाबादमध्ये अनोखा उपक्रम

नंदुरबारमध्ये लाल मिरचीचा ‘ठसका’, उत्पादन घटले दर मात्र वाढले