पावसाळ्यात कारच्या टायरमध्ये हवा किती हवी? धोका टाळण्यासाठी जाणून घ्या आताच

Car Tyre Pressure in Rainy Season: पावसाळ्यात कार चालवताना हलगर्जीपणा चांगलाच नडतो. वाहनाचेच नाही तर जीवालाही धोका उत्पन्न होऊ शकतो. पाण्यापावसात कार चालवताना विशेष काळजी घेणे आवश्यक असते. पावसाळ्यात कारच्या टायरमध्ये हवेचे प्रमाण किती हवे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती

पावसाळ्यात कारच्या टायरमध्ये हवा किती हवी? धोका टाळण्यासाठी जाणून घ्या आताच
पावसाळ्यात कारच्या टायरमध्ये हवा किती हवी?
| Updated on: Aug 02, 2026 | 9:59 AM

पावसाळ्यात दऱ्याखोऱ्या, पर्यटनस्थळ खुणावतात. निसर्ग हिरवाने नटलेला असतो. अशावेळी लाँग ड्राईव्हवर जाण्याची इच्छा होते. पण पावसाळ्यात कार चालवणे निसरडे रस्ते, अनाहूत खड्डे आणि अचानक आलेल्या चिकणमातीने कधीकधी आव्हानात्मक होते. निसरड्या रस्त्यावरून वाहन चालवणे धोकादायक ठरते. पावसाळ्यात ट्रिपवर जाण्यापूर्वी अनेकजण वायपर, ब्रेक आणि हेडलाईटची तपासणी करतात. पण टायरमधील हवेचे प्रमाण किती हवे याकडे दुर्लक्ष होते. अनेकदा पेट्रोलपंपावर अंदाज न घेता टायरमध्ये हवा भरली जाते. त्याचे गंभीर परिणाम पण सहन करावे लागतात. पावसाळ्यात टायरमध्ये योग्य प्रमाणात हवा असणे अत्यंत आवश्यक आहे. योग्य हवा नसेल तर कारची रस्त्यावरील पकड सैल होऊ शकते.

किती असावे टायर प्रेशर?

पावसाळ्यात, उन्हाळ्यात टायरमधील हवा नेहमी प्रमाणातच ठेवणे गरजेचे आहे. प्रत्येक कारसाठी हे प्रमाण कमी जास्त आहे. याची माहिती ड्रायव्हरच्या बाजूच्या दरवाज्यावरील स्टिकरवर अथवा कारच्या ओनर मॅन्यूअलमध्ये सहज लक्षात येईल. हवामान बदलल्यामुळे स्वतःहून टायरमधील हवा कमी अथवा जास्त करणे योग्य नाही.

टायरमध्ये जास्त हवा असल्यास होते काय?

चाकात गरजेपेक्षा अधिक हवा भरल्यास टायर आणि रस्त्याचे अंतर कमी होते. कारची ग्रिप कमी होते. पावसात अचानक ब्रेक लावल्यास, वळणावर कार घसरण्याचा धोका वाढतो. कंपनीच्या निर्देशानुसारच कारच्या टायरमध्ये हवा भरावी. अधिक हवा भरल्यास ओलसर, निसरड्या रस्त्यावर कार घसरत जाण्याची शक्यता वाढते.

कमी हवा असल्यासही मोठा धोका

पावसाळ्यात टायरमध्ये कमी हवा असणे सुद्धा धोक्याचे असते. थोडी कमी हवा ठेवल्यास रस्त्यावरची पकड वाढते हा समज चुकीचा आहे. कमी हवा असल्यास टायरची झिज होते. इंधन जास्त लागते. लांब प्रवासात टायर जास्त तापते. टायर खराब होण्याचा अथवा फुटण्याचा धोका वाढतो. टायर अधिक जुने झाले असेल तर ते बदलणे फायद्याचे ठरते. टायर ग्रिप आणि ट्रेडची खोली महत्त्वाची असते. टायर झिजलेले असतील तर पावसाळ्यात कारवरील नियंत्रण सुटू शकते.

या गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका

महिन्यातून किमान एकदा टायरमधील हवा तपासा

लांब पल्ल्याच्या प्रवासापूर्वी टायरमधील हवा तपासा

योग्य प्रमाणात हवा टायरमध्ये असल्याची खात्री करा

टायर झिजलेले असेल तर दूरच्या प्रवासापूर्वी ते बदलणे इष्ट ठरेल

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us