नाशिकच्या ट्रक आणि बस अपघात प्रकरणी गुन्हा दाखल, ट्रक चालकाला अटक
शनिवारी पहाटे यवतमाळवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचा आणि सूरतहून सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता.
नाशिक : नाशिक शहरातील मिर्ची हॉटेल येथे बस आणि ट्रक अपघात (Accident) प्रकरणी गुन्हा दाखल (FIR) करण्यात आला आहे. नाशिक शहर पोलीस हद्दीतील आडगाव पोलीस (Adgaon Police) ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून यामध्ये ट्रक चालक आणि बस चालक यांच्या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये मूळचा उत्तर प्रदेशचा असलेला ट्रकचालक रामजी यादवला रात्री उशिरा आडगाव पोलीसांनी अटक केली आहे. सूरतहून सिन्नरला कोळसा घेऊन जात असतांनाच बसला ट्रकने धडक दिली होती. तर यवतमाळवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचालकावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ब्रम्हनाथ सोयजी मनोहर असे त्याचे नाव असून त्याचा अपघातात मृत्यू झाला होता. या अपघातात आत्तापर्यन्त 12 जणांचा मृत्यू झाला असून एकूण 31 जण जखमी आहे. त्यातील मृत प्रवाशांपैकी 8 जणांची ओळख पटली आहे.
शनिवारी पहाटे यवतमाळवरुन मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या बसचा आणि सूरतहून सिन्नरकडे जाणाऱ्या ट्रकचा भीषण अपघात झाला होता.
या अपघातात खाजगी प्रवासी बस ला आग लागली होती. त्यात जवळपास 43 प्रवासी होते. त्यातील 12 जणांचा मृत्यू झाला आहे. 31 जणांवर उपचार सुरू आहे.
या अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांना राज्य सरकारने 5 लाख आणि केंद्र सरकारने 2 लाख अशी मदत जाहीर केली आहे.
तर अपघातात जे जखमी झाले आहेत त्यांच्यावर सरकारकडून उपचार सुरू असून अधिकचा तपास नाशिकचे आडगाव पोलीस करीत आहे.
या अपघातस्थळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री दादा भुसे, मंत्री गिरीश महाजन, यांच्यासह शासकीय अधिकाऱ्यांनी पाहणी केली होती.
या घटनेत आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे. अशातच ब्लॅक स्पॉटमध्ये हा अपघातस्थळाचा उल्लेख करण्यात आला आहे.
यामध्ये भादवि कलम आणि मोटर वाहन कायदा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून इरफान शेख या गुन्ह्याचे तपासी अधिकारी आहेत.