महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चिमुकल्यांचा करुण अंत, वाचा नेमके काय घडले?

| Updated on: Oct 08, 2022 | 9:02 PM

गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेला.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चिमुकल्यांचा करुण अंत, वाचा नेमके काय घडले?
अहमदनगरमध्ये वीजेचा शॉक लागून एकाच कुटुंबातील चार मुलांचा मृत्यू
Image Credit source: TV9
Follow us on

मनोज गाडेकर, TV9 मराठी, अहमदनगर : वीजवाहक तारेचा धक्का बसून एकाच चार बालकांचा दुर्दैवी मृत्यू (Four Children Death by Electric Shock) झाल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यातील (Sangamner Taluka Ahmednagar) खंदरमाळवाडी गावाअंतर्गत येणाऱ्या वांदरकडा येथे आज घडली आहे. या घटनेमुळे बर्डे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. सदर वीजवाहक तार गेल्या चार दिवसांपासून तुटली आहे. मात्र महावितरण याकडे वेळीच लक्ष न दिल्याने ही दुर्दैवी घटना घडली. या घटनेमुळे महावितरणचा भोंगळ कारभार (Mismanagement of Mahavitaran) पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे.

मोलमजुरी करुन बर्डे कुटुंबीय उदरनिर्वाह करत होते

वांदरकडा परिसरात अजित बर्डे आणि अरुण बर्डे हे दोघे भाऊ आपल्या कुटुंबासह राहतात. बर्डे कुटुंबीय मोलमजुरी करुन आपले उदरनिर्वाह चावलतात. दोन्ही अजित बर्डे यांना 8 वर्षाचा आणि 6 वर्षाचा असे दोन मुलगे होते, तर अरुण बर्डे यांना 12 वर्षे आणि 10 वर्षाचे दोन मुलगे होते.

शाळा सुटल्यानंतर खेळायला गेली होती मुले

शनिवारी दुपारी शाळा सुटल्यानंतर ही चारही मुलं घराजवळ खेळत होती. जवळच असलेल्या नाल्याजवळ मुले खेळत होती. खेळता असतानाच नाल्याजवळ असलेल्या वीजवाहक तारेचा मुलांना धक्का लागला आणि तारही मुले जागीच ठार झाली.

हे सुद्धा वाचा

आजीच्या ही बाब लक्षात आल्यानंतर तिने आरडाओरडा केला

यावेळी तेथेच आसपास शेळ्या चारत असलेली मुलांची आजी अलकाबाई बर्डे हिच्या ही बाब लक्षात आली. यानंतर अलकाबाईने जोरजोरात आरडाओरडा केला. अलकाबाईचा आरडाओरडा ऐकून आसपासच्या लोकांनी धाव घेतली.

घारगाव पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेतले

याबाबत घारगाव पोलिसांना तात्काळ माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत घटनेचा पंचनामा केला. त्यानंतर चारही मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठवले.

महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे चार बालकांचा नाहक बळी

गेल्या चार दिवसांपासून ही वीजवाहक तुटली आहे. मात्र महावितरणने याकडे लक्ष दिले नाही. यामुळेच ही दुर्घटना घडली आणि चार निष्पाप बालकांचा बळी गेल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. घटनेची माहिती कळताच स्थानिक नेते, वायरमन, पोलिसांनी घटनस्थळी धाव घेत पाहणी केली.