ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..

अंगावर पाणी पडताच ती मुलगी गंभीररित्या भाजली. जखमी अवस्थेत तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमी विद्यार्थिनीची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असून पाण्याऐवजी बादलीत ॲसिड कोणी आणि का ठेवलं ? याचा शोध सुरू आहे.

ती अंघोळीला गेली, अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि किंकाळी..
Image Credit source: प्रातिनिधीक फोटो
| Updated on: May 17, 2024 | 1:27 PM

हैदराबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एक काळीज पिळवटून टाकणारी घटना घडल्याचे समोर आले आहे. तेथील एका विद्यार्थिनीसोबत धक्कादायक प्रकार घडला. अंघोळीला गेलेल्या विद्यार्थिनीच्या अंगावर पाण्याऐवजी ॲसिड पडलं आणि ती वाईटरित्या होरपळली. ICFAI युनिव्हर्सिटीमध्ये बीटेकच्या अंतिम वर्षाचं शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीसोबत हा धक्कादायक प्रकार घडला. पीडित विद्यार्थिनी हॉस्टेलच्या बाथरूममध्ये अंघोळीला गेली होती, मात्र तेथील बादलीत पाण्याऐवजी कोणीतरी ॲसिड ठेवले होते. ते शरीरावर पडताच ती होरपळून जखमी झाली. तिला उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले.

मिळालेल्या माहितीनुसार, 16 मे रोजी विद्यापीठाच्या चौथ्या मजल्यावर ही खळबळजनक घटना घडली. या घटनेमुळे संपूर्ण कॅम्पसमधील विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. ॲसिडमुळे ती विद्यार्थिनी गंभीररित्या भाजल्याचे पीडितेच्या मित्रांचे म्हणणे आहे. तिच्यावर उपचार सुरू असले तरी तिची प्रकृती अतिशय गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

पोलिसांकडून तपास सुरू

पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मात्र, बाथरूममधीर त्या बादलीत पाण्याऐवजी ॲसिड कोणी आणि का ठेवले होते, हे अद्याप समजू शकलेले नाही. स्थानिक मीडिया रिपोर्ट्सनुसार, पोलिसांनी आपल्या अधिकृत निवेदनात ॲसिड हल्ल्याची शक्यता नाकारली आहे. या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. बादलीत कोणतेही ऍसिड नव्हते. उलट गरम पाण्यामुळे हा दुर्दैवी अपघात झाल्याचा दाव पोलिसांनी केला. मात्र त्यामुळे आता खरं काय , खोटं काय याचा संभ्रम निर्माण झाला आहे.

ही घटना नेमकी कशामुळे घडली याचा तपास सुरू आहे. पण ज्या विद्यापीठात ही दुर्दैवी घटना घडली त्या विद्यापीठाच्या व्यवस्थापनाने याबाबत काहीही बोलण्यास नकार दिला आहे. रुग्णालयात संबंधित पीडितेच्या प्रकृतीवर बारकाईने लक्ष ठेवले जात आहे.