Jalna | बंदुकीचा धाक दाखवत 07 लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली, जालन्यात काय घडलं?

एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आपल्याला लुटले असल्याची तक्रार व्यापाऱ्याने केली. मोंढ्यापासून व्यापाऱ्यावर पाळत ठेवून लुटले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे.

Jalna | बंदुकीचा धाक दाखवत 07 लाखांची रोकड अन् दुचाकीही पळवली, जालन्यात काय घडलं?
| Edited By: | Updated on: May 10, 2022 | 9:18 AM

जालनाः गाडीच्या डिक्कीत सात लाख रुपये घेऊन जात असलेल्या व्यापाऱ्यावर (Trader) पाळत ठेवून त्याच्याकडून ही रक्कम पळवल्याची धक्कादायक घटना जालन्यात (Jalna Theft) घडली. शहरातील गोल्डन ज्युबली शाळेजवळ सोमवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास ही थरारक घटना घडली. जालन्यातील साखरेचे व्यापारी असलेल्या अशोक कुमार अग्रवाल यांनी स्कुटीच्या डिक्कीत 07 लाख रुपयांची रक्कम ठेवली होती. चोरट्यांनी रस्त्यातच त्यांचा अडवून बंदुकीचा धाक दाखवून त्यांच्याकडून रोकड तर घेतलीच शिवाय व्यापाऱ्याची दुचाकीदेखील पळवली. ही घटना परिसरातील सीसीटीव्ही (theft caught in CCTV) मध्ये कैद झाली असून पोलीस आता या चोरट्यांचा तपास करत आहेत. शहरातली ज्युबिली शाळेजवळ घडलेल्या या घटनेमुळे नागरिकांमध्ये दहशत पसरली आहे.

काय घडली नेमकी घटना?

जालना शहरातील साखरेचे व्यापारी अमितकुमार अशोककुमार अग्रवाल यांचे नवीन मोंढा भागात तिरुपती ट्रेडर्स नावाचे दुकान आहे. रात्री 08 वाजेच्या सुमारास दुकान बंद करून व्यापाराची रक्कम घेऊन ते जात होते. त्यांनी स्कूटीच्या डिक्कील 06 लाख 92 हजार रुपये स्कुटीच्या डिक्कीत ठेवले व ते घराकडे निघाले. रस्त्यात गोल्डन ज्युबली शाळेसमोरून निघाले असताना मोटर सायकल घेऊन आलेल्या चोरट्यांनी त्यांना शाळेसमोर अडवून गावठी पिस्तुलाचा धाक दाखवून स्कुटीवरून खाली पाडले. त्यानंतर चोरटे रोकड असलेली स्कूटी घेऊन पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक पथकासह तेथे पोहोचले.

लुटण्यासाठी तिघे आले होते…

दरम्यान, एका दुचाकीवरून आलेल्या तिघांनी आपल्याला लुटले असल्याची तक्रार व्यापाऱ्याने केली. मोंढ्यापासून व्यापाऱ्यावर पाळत ठेवून लुटले असावे, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे. या घटनेमुळे व्यापारी वर्गात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेनंतर स्थानिक गुन्हे शाखा, सदर बाजार पोलीस यांच्याकडून जागोजागी नाकेबंदी करून चोरट्यांचा शोध घेतला जात आहे. मागील पंधरा दिवसात पाच चोऱ्यांच्या घटना घडल्यामुळे नागरिकांमध्ये दहशत निर्माण झाली आहे.