सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह

| Updated on: Aug 24, 2021 | 3:55 PM

50 वर्षीय महिला गेल्या गुरुवारी (19 ऑगस्ट रोजी) बेपत्ता झाली होती. पहाटे 3 ते 5 वाजताच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता ती निघून गेल्याचा दावा केला जातो

सावत्र बापाने पंचगंगेत बुडवलेल्या मुलीला शोधताना सापडला 50 वर्षीय बेपत्ता महिलेचा मृतदेह
बेपत्ता महिलेचा मृतदेह पंचगंगेत सापडला
Follow us on

इचलकरंजी : गेल्या पाच दिवसांपासून बेपत्ता असलेल्या कोल्हापुरातील 50 वर्षीय महिलेचा मृतदेह आढळला. इचलकरंजीत राहणाऱ्या विजया श्रीकांत पोतदार यांचा मृतदेह सोमवारी पंचगंगा नदीत आढळून आला. गावभाग पोलिस ठाण्यात याबाबतची नोंद झाली आहे.

नेमकं काय घडलं?

विजया पोतदार (वय 50 वर्ष, मुजावर गल्ली गावभाग, इचलकरंजी) ही महिला गेल्या गुरुवारी (19 ऑगस्ट रोजी) बेपत्ता झाली होती. पहाटे 3 ते 5 वाजताच्या दरम्यान घरात कोणालाही काहीही न सांगता ती निघून गेल्याचा दावा केला जातो. नातेवाईकांकडे आणि इतरत्र शोध घेऊनही त्या कुठेच सापडल्या नव्हत्या.

बेपत्ता मुलीचा शोध घेताना महिलेचा मृतदेह सापडला

विजया पोतदार बेपत्ता झाल्याची तक्रार महेश पोतदार यांनी गावभाग पोलिस ठाण्यात दिली होती. गेल्या चार दिवसांपासून त्यांचा शोध सुरु होता. याच दरम्यान सोमवारी यळगूड येथील बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध घेत असताना पंचगंगा नदीच्या पुलापासून पात्रात पुढे 2 किलोमीटर अंतरावर विजया पोतदार यांचा मृतदेह सापडला. पालिकेच्या आपत्कालीन पथकाने मृतदेह पाण्याबाहेर काढला आणि नातेवाईकांच्या ताब्यात दिला.

इचलकरंजीत सावत्र पित्याकडून मुलीची हत्या

कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शहरालगतच्या यळगूड गावात राहणाऱ्या पित्याने आपल्या सावत्र मुलीची हत्या केली होती. नऊ वर्षीय मुलीला पंचगंगा नदी घाटावर नेऊन पाण्यात बुडवून ढकलून दिले. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

मुलीचा मृतदेह मोठ्या पुलाच्या पलिकडील बाजूला नदी किनाऱ्यावर अडकल्याचे शोध पथकाला आढळून आले. बऱ्याच प्रयत्नानंतर तो मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला. चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यास पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या टीमला यश आले. यावेळी विजया पोतदार यांचा मृतदेह सापडला.

तीन गुन्ह्यांनी कोल्हापूर हादरलं

कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि महापुराच्या संकटाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत चालले आहे. असे असतानाच आता इचलकरंजी शहरासह जिल्ह्यामध्ये तीन मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या मुलीचे एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याच्या संशयावरुन कृष्णा नदीमध्ये ढकलून दिले होते. त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला होता.

हे प्रकरण ताजे असतानाच कागल तालुक्यात एकाने मूल होत नसल्याच्या कारणावरून आपल्या मित्राच्या मुलाला पळवून नेऊन त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. त्याचपाठोपाठ आता हातकणंगले तालुक्यातील यळगूड गावातील व्यक्तीने आपल्या सावत्र मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

संबंधित बातम्या :

नऊ वर्षीय मुलीला पंचगंगेत बुडवून ढकललं, 14 तासांनी मृतदेह सापडला, सावत्र बापाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं

कृष्णा नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार, वडिलांचा बनाव ‘असा’ झाला उघड