नऊ वर्षीय मुलीला पंचगंगेत बुडवून ढकललं, 14 तासांनी मृतदेह सापडला, सावत्र बापाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं

| Updated on: Aug 24, 2021 | 2:12 PM

सावत्र बापाने मुलीला मोटरसायकलवर बसवून इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर आणले. त्यानंतर तिला नदीपात्रातील पाण्यामध्ये बुडवून ढकलून दिले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

नऊ वर्षीय मुलीला पंचगंगेत बुडवून ढकललं, 14 तासांनी मृतदेह सापडला, सावत्र बापाच्या कृत्याने कोल्हापूर हादरलं
प्रतिकात्मक फोटो
Follow us on

इचलकरंजी : कोल्हापूर जिल्ह्यात इचलकरंजी शहरालगतच्या यळगूड गावात राहणाऱ्या पित्याने आपल्या सावत्र मुलीची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. नऊ वर्षीय मुलीला पंचगंगा नदी घाटावर नेऊन पाण्यात बुडवून ढकलून दिले. यामध्ये अल्पवयीन मुलीचा मृत्यू झाला. हा प्रकार मंगळवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास उघडकीस आला.

मुलीचा मृतदेह मोठ्या पुलाच्या पलिकडील बाजूला नदी किनाऱ्यावर अडकल्याचे शोध पथकाला आढळून आले. बऱ्याच प्रयत्नानंतर तो मृतदेह पात्राबाहेर काढण्यात आला. या प्रकरणी सावत्र बापाला संशयावरुन ताब्यात घेण्यात आले होते. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने या गुन्ह्याची कबुली दिली आहे. चौदा तासांच्या अथक प्रयत्नानंतर मृतदेह शोधण्यास पोलीस आणि रेस्क्यू फोर्सच्या टीमला यश आले आहे.

तीन गुन्ह्यांनी कोल्हापूर हादरलं

कोरोना महामारी, लॉकडाऊन आणि महापुराच्या संकटाने विस्कळीत झालेले जनजीवन पूर्वपदावर येत चालले आहे. असे असतानाच आता इचलकरंजी शहरासह जिल्ह्यामध्ये तीन मोठ्या गुन्ह्याच्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. शिरोळ तालुक्यात एका निर्दयी बापाने आपल्या मुलीचे एका दुसऱ्या मुलीवर प्रेम असल्याच्या संशयावरुन कृष्णा नदीमध्ये ढकलून दिले होते. त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण ताजे असतानाच कागल तालुक्यात एकाने मूल होत नसल्याच्या कारणावरून आपल्या मित्राच्या मुलाला पळवून नेऊन त्याची निर्घृण हत्या केली होती. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये खळबळ माजली होती. त्याचपाठोपाठ आता हातकणंगले तालुक्यातील यळगूड गावातील व्यक्तीने आपल्या सावत्र मुलीची निर्घृणपणे हत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली.

काय आहे प्रकरण?

रविवारी रक्षाबंधन कार्यक्रम उरकल्यावर बापाने सावत्र मुलीला आपल्या मोटारसायकलवर बसवले. आपण गावामध्ये जाऊन येऊ, असे सांगून तो तिला घेऊन गेला. यानंतर तिला एका ऊसाच्या शेतामध्ये नेऊन तिथेच सोडून दिले होते. पण मुलीने त्याच्या मोटारसायकलचा पाठलाग केला. त्यामुळे बापाने तिला पुन्हा मोटरसायकलवर बसवून इचलकरंजी पंचगंगा नदी घाटावर आणले. त्यानंतर तिला नदीपात्रातील पाण्यामध्ये बुडवून ढकलून दिले. यामध्ये तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

बापाकडूनच मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार

या घटनेनंतर संशयित आरोपीने आपली सावत्र मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार हुपरी पोलिस ठाण्यात दिली होती. या तक्रारीनुसार हुपरी पोलिसांनी तिचा शोध सुरु केला होता. यावेळी संशयित आरोपी देखील पोलिस तपास पथकासोबत हजर होता. पण पोलिसांनी त्याच्यावर संशय ठेवून त्याला पोलिसी खाक्या दाखवल्यानंतर त्याने सावत्र मुलीला इचलकरंजी पंचगंगा नदीतील पाण्यात बुडवून ढकलून दिल्याची कबुली दिली. त्यानंतर पोलिसांनी काल सोमवारी संध्याकाळी पंचगंगा नदी पात्रामध्ये तिचा शोध घेतला असता ती सापडली नाही. आज मंगळवारी सकाळी पुन्हा तिचा शोध घेण्याचा प्रयत्न सुरु ठेवला.

नातेवाईकांची रुग्णालयाबाहेर निदर्शने

इचलकरंजी नगरपालिका आपत्ती व्यवस्थापन समितीचे संजय कांबळे आणि पोलिसांनी तिचा मृतदेह शोधून नदीपात्राबाहेर काढला. यावेळी चिमुकल्या मुलीचा मृतदेह पाहून तिच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला होता. घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक जयश्री गायकवाड, हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए.पी. मस्के यांनी तपास करुन हा मृतदेह आयजीएम रुग्णालयामध्ये शवविच्छेदनासाठी पाठवला. पण नातेवाईक आणि शहरातील मनसे कार्यकर्त्यांनी आयजीएम रुग्णालयाबाहेर निदर्शने केली. तसेच संशयित आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे, त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल करा आणि अन्य आरोपींना अटक करा, अशी मागणी करत निदर्शने केली.

यावेळी आयजीएम रुग्णालयाबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात ठेवण्यात आला. तर गावांमध्ये स्थानिक नागरिकांनी आरोपीला कठोर शिक्षा झाली पाहिजे यासाठी गावातून मोर्चा काढण्यात आला होता. जिल्ह्यातील तीन विविध गंभीर घटनांमुळे मोठी खळबळ उडाली असून हळहळ देखील व्यक्त होत आहे.

संबंधित बातम्या :

मूल होत नाही म्हणून मित्राच्या मुलाचं अपहरण, नंतर निर्घृण हत्या, मृतदेह शेतात पुरला, कोल्हापूर हादरलं

कृष्णा नदीत ढकलून मुलीला संपवलं, मग स्वतःच पोलिसात तक्रार, वडिलांचा बनाव ‘असा’ झाला उघड