
अनेक वर्षांनी त्याला त्याची जुनी वर्गमैत्रीण दिसली. त्याचं तर लग्न झालं होतंच पण त्या मैत्रिणीचाही विवाह झाला होता. मात्र तरीही दोघांमध्ये बोलणं सुरू झालं. आता आपापल्या पार्टनर्सना घटस्फोट देऊया आणि आपण एकत्र राहूया, असं दोघांनीही ठरवलं. त्यानंतर त्या इसमाने घटस्फोटही घेतली आणि त्याच्या वर्गमैत्रिणीसोबत लिव्ह-इनमध्ये राहू लागला. पण तीच त्याची मोठी चूक ठरली. ज्या महिलेसाठी त्याने आपलं कुटुंबं सोडलं, तीच (महिला) त्याला चूना लावून गेली, एका क्षणात त्याचं सगळच उद्ध्वस्त झालं.
मिळालेल्या माहितीनुसार, हे मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या चुनाभट्टी परिसरातील आहे. एका 48 वर्षीय सरकारी कर्मचाऱ्याने त्याची माजी वर्गमत्रीण आणि तिच्या सात साथीदारांविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे. पीडित व्यक्तीने पोलिसांना सांगितलं की- माझं लग्न 2003साली झालं. त्यानंतर 2018 मध्ये, मी माझ्या जुन्या वर्गमैत्रिणीला भेटलो. आम्ही एकमेकांशी बोलू लागलो, नंतर आम्ही ठरवलं की आता आपण आपलं आयुष्य एकत्र घालवूया. यामुळे घरातही भांडणे झाली. 2021 साली मी माझ्या पत्नीला घटस्फोट दिला.
लिव्ह इनमध्ये राहिला पण…
नंतर मी आणि माझी वर्गमैत्रीण, आम्ही दोघं एकत्र राहू लागलो. दरम्यान, तिने घर खरेदी करण्यासाठी माझ्याकडे 15 लाख रुपयांची मदत मागितली. मी काहीही विचार न करता तिला पैसे दिले. मग मी तिला विचारले की तू तुझ्या पतीपासून घटस्फोट कधी घेत आहेस, मात्र ते ऐकून ती टाळाटाळ करू लागली. यानंतर आमच्यात वाद सुरू झाला, मग ती म्हणाली- आधी तू मला पीएफमध्ये वारस बनव आणि वडिलोपार्जित घर माझ्या नावावर कर. मगच मी तुझ्याशी लग्न करेन. मी असं करण्यास स्पष्ट नकार दिला. अखेर ऑक्टोबर 2024 साली आम्ही कुटुंबातील सदस्यांच्या उपस्थितीत नाते संपवण्याचा निर्णय घेतला.
मारहाणीचा आरोप
मात्र 20 दिवसांनंतर, त्या महिलेचा एक मित्र मला धमकावण्यासाठी माझ्या इमारतीत आला असा आरोप पीडित इसमाने केला. त्याबद्दल त्याने काळाचौकी पोलिस ठाण्यात तक्रार केली. पीडित इसमाच्या सांगण्यानुसार, बुधवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास तो त्याच्या मित्रासोबत पनवेल महामार्गावर दुचाकीवरून जात होता, तेव्हा प्रियदर्शिनी बस स्टॉपजवळ एका दुचाकीस्वाराने त्याच्या गाडीला धडक दिली. विरोध केला तेव्हा त्या महिलेचा मुलगा आणि इतर लोक तिथे पोहोचले. त्यानंतर त्या महिलेचा मुलगा आणि 7-8 जणांनी मिळून त्या इसमाला लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. एवढंच नव्हे तर ती महिला देखील तिथे उपस्थित होती आणि तिनेही मारल्याचा आरोप आहे. हे भांडण आणि मारहाणीदरम्यान पीडित इसमाची सोन्याची चेन, घड्याळ, अंगठी आणि पाकिट गायब झालं असाही आरोप करण्यात आला.
रिक्षातून धक्का देऊन फेकलं
एवढंच नव्हे तर पीडित इसमाला जबरदस्तीने ओलीस ठेवून रिक्षातून खाली फेकून दिल्याचा आरोप आहे. त्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी महिला, तिचा मुलगा आणि इतर सात आरोपींविरुद्ध अपहरण आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला आहे.