तरुण तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेला, कारण नसताना पोलिसाकडून कानशिलात, कानाचा पडदा फाटला

| Updated on: Aug 10, 2021 | 10:56 PM

अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला आहे.

तरुण तक्रारीसाठी पोलीस ठाण्यात गेला, कारण नसताना पोलिसाकडून कानशिलात, कानाचा पडदा फाटला
Follow us on

अंबरनाथ (ठाणे) : अंबरनाथमध्ये पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेलेल्या एका तरुणाने पोलिसांनी आपल्याला बेदम मारहाण केल्याचा आरोप केला आहे. या मारहाणीत तरुणाच्या कानाचा पडदा फाटला आहे. त्याच्यावर शस्त्रक्रिया करावी लागणार आहे. पण पोलिसांनी मात्र मारहाण झाल्याचे आरोप फेटाळून लावले आहेत.

नेमकं प्रकरण काय?

अंबरनाथ पश्चिमेला राहणारा सुमेध वेलायुधन हा तरुण त्याच्या बहिणीसह सोमवारी (9 ऑगस्ट) रात्री अंबरनाथ पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेला होता. यावेळी आधी खाडे नामक अधिकाऱ्यांनी त्याला बाहेर थांबण्यास सांगितलं. मात्र नंतर पाटील नामक एका कॉन्स्टेबलनी त्याला आतमध्ये बोलावलं. मात्र त्याचवेळी खाडे यांनी त्याला आतमध्ये कसा आला? अशी विचारणा केली. यावर सुमेध वेलायुधन याच्या बहिणीने बोलण्याचा प्रयत्न केला असता खाडे यांनी सरळ सुमेध याला मारायला सुरुवात केल्याचा आरोप सुमेध वेलायुधन याने केला आहे.

पीडित तरुणाचे पोलिसांवर गंभीर आरोप

खाडे यांनी मला मारत-मारत लॉकअपकडे नेलं आणि इतक्या जोरात कानाखाली मारली की माझ्या कानाला इजा झाली, असा आरोप सुमेध वेलायुधन याने केला आहे. यानंतर सुमेध याने अंबरनाथ सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांना पाचारण केलं. बर्मन यांनी रात्री याबाबत पोलीस दलाच्या वरिष्ठांना ट्विट केल्यानंतर ठाणे पोलीस आयुक्तालयाने याची त्वरित दखल घेतली.

पोलिसावर कडक कारवाईची मागणी

दरम्यान, आज सकाळी सुमेध हा उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात गेला असता त्याच्या कानाचा पडदा फाटल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच यावर शस्त्रक्रिया करण्याची गरज असल्यानं त्याला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात रेफर करण्यात आलं. या प्रकारानंतर सुमेध वेलायुधन याने त्याला मारहाण करणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे.

पोलिसांची भूमिका काय?

अंबरनाथ सिटीझन फोरमचे सत्यजित बर्मन यांनी संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर एफआयआर नोंदवण्याची मागणी केली आहे. दरम्यान, याबाबत अंबरनाथ पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय धुमाळ यांना विचारलं असता, त्यांनी मात्र पोलिसांनी कुणालीही मारहाण केलेली नसल्याचं सांगितलं.

हेही वाचा :

सात ते आठ टक्क्याने पैसे देतो सांगून पैसे उकळले, 1 कोटी रुपये घेऊन फरार, महाराष्ट्र पोलिसांनी उत्तर प्रदेशातून शोधून काढलं

मायलेकीच्या नात्याला काळीमा, दहावीत 92 टक्के मिळवणाऱ्या मुलीकडून आईची गळा आवळून हत्या, हादरवणारी घटना