Anil Deshmukh | पीएंच्या अटकेनंतर अनिल देशमुख रडारवर, ईडी चौकशीला हजेरीची शक्यता

| Updated on: Jun 29, 2021 | 10:28 AM

ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी अटक केली

Anil Deshmukh | पीएंच्या अटकेनंतर अनिल देशमुख रडारवर, ईडी चौकशीला हजेरीची शक्यता
माजी गृहमंत्री अनिल देशमुख
Follow us on

मुंबई : माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आज ईडीतर्फे चौकशी होण्याची शक्यता आहे. अनिल देशमुख यांच्या दोन खासगी सचिवांना गेल्या आठवड्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्या चौकशीत अनेक महत्त्वाची माहिती उघड झाल्यानंतर आता अनिल देशमुख यांचा नंबर आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या कथित वसुली आदेशांचा आरोप केला आहे. याच प्रकरणाचा तपास सध्या ईडीकडून सुरु आहे. (Former Home Minister Anil Deshmukh may face ED enquiry in Money Laundering Case)

अनिल देशमुख यांना शनिवार 26 जून रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, त्या दिवशी त्यांनी विनंती अर्ज देऊन चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता. ईडी अधिकाऱ्यांनी त्या दिवशी त्यांना सवलत दिली. मात्र त्याच दिवशी, म्हणजे शनिवारीच अनिल देशमुख यांना दुसरं समन्स बजावून 29 जून म्हणजेच आज चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले.

देशमुखांकडून ईडीला निवेदन नाही

चौकशीला गैरहजर राहायचं असल्यास तसं निवेदन ईडी अधिकाऱ्यांना द्यावं लागतं. अनिल देशमुख यांनी शनिवारी गैरहजर राहण्याबाबत निवेदन दिलं होतं. मात्र, आज त्यांनी गैरहजर राहण्याबाबत निवेदन दिलेलं नाही. यामुळे ते चौकशीला हजर राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

नेमकं काय घडलं?

ईडीने शनिवारी (25 जून) माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या नागपूर आणि मुंबईतील घरांसह पाच ठिकाणी छापा टाकला होता. यानंतर रविवारी अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे आणि खासगी सहायक कुंदन शिंदे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतलं. त्यांची 10 तास चौकशी केल्यानंतर रात्री साडेबारा वाजता दोघांना अटक करण्यात आली. मनी लाँड्रिंग प्रतिबंध कायद्या (PMLA) अंतर्गत शिंदे आणि पालांडे यांना अटक करण्यात आली. यानंतर अनिल देशमुख यांना तात्काळ चौकशीसाठी हजर राहण्यास सांगण्यात आलं होतं. मात्र, अनिल देशमुख हे चौकशीसाठी हजर राहिले नव्हते. त्यांनी ईडीच्या अधिकाऱ्यांना निवेदन पाठवून चौकशीला हजर राहण्यासाठी वेळ मागितला होता.

अनिल देशमुखांची प्रतिक्रिया

“मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माझ्यावर खोटे आरोप केले. त्यांना पदावरुन हटवल्यानंतर त्यांनी माझ्यावर आरोप केले. त्यांच्या संशयास्पद भूमिकेवरुन त्यांना आयुक्तपदावरुन हटवण्यात आलं होतं. त्यानंतर त्यांनी आरोप केले. त्यांना आरोप करायचे होते तेव्हा ते आयुक्त असताना त्यांनी माझ्यावर आरोप करायला हवे होते”,  अशी भूमिका माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मांडली आहे.

जयश्री पाटील म्हणतात देशमुखांना अटक होणारच

“माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधातील सर्व पुरावे आता ईडीच्या हाती लागले आहेत. देशमुख यांच्या दोन सहकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे त्यांनाही अटक होईल” अशी प्रतिक्रिया अनिल देशमुख यांच्या विरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल करणाऱ्या अ‍ॅड. जयश्री पाटील यांनी दिली आहे. तसेच या प्रकरणात पडू नका म्हणून आपल्याला धमकीही देण्यात आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

काय आहे प्रकरण?

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Parambir Singh) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून गंभीर आरोप केले होते. त्या पत्रानुसार निलंबित सहायक पोलीस निरीक्षक सचिन वाझे (Sachin Vaze) हे क्राईम इंटिलिजन्सचं यूनिट हेड करत होते. गेल्या काही महिन्यात (तत्कालीन) गृहमंत्री अनिल देशमुखांना कित्येक वेळेस वाझेंना त्यांच्या ज्ञानेश्वर या निवासस्थानी बोलवलं आणि दर महिन्याला 100 कोटी रुपये जमा करायला सांगितलं. देशमुख वाझेंना म्हणाले की, मुंबईत 1750 बार आणि रेस्टॉरंट आहेत आणि त्यातल्या प्रत्येकाकडून 2 ते 3 लाख रुपये कलेक्ट केले तरीसुद्धा महिन्याला 40 ते 50 कोटी रुपये सहज उपलब्ध होतील. राहिलेली इतर रक्कम इतर मार्गांनी जमा करता येईल, असा दावा परमबीर सिंग यांनी पत्रातून केला होता.

अनिल देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या निवसस्थानी बोलवायचे. पोलिसांना ते सातत्याने सूचना द्यायचे. मला किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात देऊन देशमुख हे पोलीस अधिकाऱ्यांना त्यांच्या बंगल्यावर बोलवायचे आणि पैसे गोळा करण्यासाठी टार्गेट द्यायचे. टार्गेटनुसार ते पोलीस अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाजात तसेच आर्थिक व्यवहारात सल्ला आणि निर्देश द्यायचे. पैसे गोळा करण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांचा ते उपयोग करायचे. त्यांचे हे भ्रष्ट आचरण अनेक पोलीस अधिकाऱ्यांच्या नजरेस आले होते, असे आरोप मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी देशमुखांवर केले होते. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना पत्र लिहून हे आरोप केले होते.

संबंधित बातम्या : 

पालांडे आणि कुंदनला पाच दिवसांची कोठडी, अनिल देशमुखांवर ईडीच्या वकिलांचे गंभीर आरोप, दिवसभरात काय-काय घडलं?

(Former Home Minister Anil Deshmukh may face ED enquiry in Money Laundering Case)