सोशल मीडियावरील मैत्रिणीवर जीव जडला, पण तिनेच घात केला, हनीट्रॅपमध्ये अडकवत लाखो लुटले, बांधकाम व्यावसायिकाची दर्दभरी कहाणी

| Updated on: Aug 17, 2021 | 7:34 PM

सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे.

सोशल मीडियावरील मैत्रिणीवर जीव जडला, पण तिनेच घात केला, हनीट्रॅपमध्ये अडकवत लाखो लुटले, बांधकाम व्यावसायिकाची दर्दभरी कहाणी
प्रातिनिधिक फोटो
Follow us on

नवी मुंबई : सोशल मीडियावर झालेली ओळख ही अंगलट आल्याच्या अनेक घटना आपल्या आसपास घडत असतात. पनवेल येथील एका तरुण बांधकाम व्यावसायिकालाही सोशल मीडियावर एका तरुणीशी झालेली ओळख चांगलीच अंगलट आली आहे. सोशल मीडियावर ओळख झालेल्या या तरुणीने बांधकाम व्यावसायिकाला हनीट्रॅपमध्ये अडकवलं. त्यानंतर त्याच्याकडून लाखो रुपये उकळल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी कोंढवा पोलिसांनी या तरुणीसह सहा जणांच्या टोळीला अटक केली आहे.

आरोपी तरुणीचा पती जेलमध्ये

केवळ नववी पास असलेली ही तरुणी सोशल मीडियाचा वापर करण्यात चांगलीच पटाईत आहे. तिचा पती खूनाच्या गुन्ह्यात कारागृहात शिक्षा भोगतोय. पती कारागृहात गेल्यावर पतीच्या गुन्हेगार मित्रासोबत तिची ओळख झाली अन् यातूनच हनीट्रॅप करणाऱ्या नव्या टोळीचा उदय झाला. अनेकजण त्यांचे सावज सुद्धा झाले. कोणी अब्रूला घाबरुन तर कोणी भीतीपोटी त्यांना पैसे देत पोलिसात जाण्याचे टाळले.

तक्रारीनंतर अवघ्या 72 तासात बेड्या

मात्र चार दिवसांपूर्वी मुंबईच्या एका व्यवसायिकाने पोलिसात जाण्याचे धाडस केले. अन् अवघ्या 72 तासांच्या आत पोलीस उपनिरीक्षक प्रभाकर कापुरे आणि त्यांच्या पथकाने संपूर्ण हनीट्रॅप करणारी ही टोळी गजाआड केली. या टोळीने पनवेल येथील 31 वर्षीय व्यवसायिकाला मारहाण करत खंडणी उकळली होती. या घटनेंतर व्यावसायिकाने पोलिसात धाव घेतली होती.

याप्रकरणी पोलिसांनी सहा जणांच्या टोळीला कोंढवा पोलिसांनी बेड्या ठोकल्या. रविंद्र भगवान बदर (वय 26), सचिन भातुलकर, आण्णा साळुंके (वय 40), अमोल ढवळे (वय 32), मंथन शिवाजी पवार (वय 24) आणि 19 वर्षीय तरुणी अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

टोळीने अनेकांना लुबाळल्याचा पोलिसांचा अंदाज

या टोळीने अनेकांना हनीट्रॅपच्या माध्यमातून लुटल्याचा पोलिसांना संशय आहे. मात्र काही जण भीतीपोटी किंवा अब्रुला घाबरुन पुढे येत नाहीत. त्यामुळे अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असेल, किंवा कोणाकडून खंडणी उकळली गेली असेल तर त्यांनी कोंढवा पोलिसांशी संपर्क करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा :

नाशिकमध्ये तृतीयपंथीयांचा राडा, टोलनाक्यावर प्रवाशांना शिवीगाळ-बाचाबाची, नंतर मारहाण, तुफान हाणामारीचा व्हिडीओ समोर

वाघ आणि बिबट्याची नखे विकायचे, वन विभागाने सापळा रचला, रंगेहात मुसक्या आवळल्या, वाचा थरार