पत्नीचा हनीट्रॅप प्रमाणे वापर, मुंबईतील दोन धनदांडग्यांच्या हत्या, सिमरन सूद-विजय पालांडे कसे लागले होते पोलिसांच्या हाती?

| Updated on: Aug 17, 2021 | 7:55 AM

सिमरन म्हणजे मूळची लुधियानाची कला शाखा पदवीधर सीमा सुंदरनाथ दोसांज. 1990 च्या सुमारास फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. गुन्हेगारी क्षेत्रात कशी झाली तिची एण्ट्री, वाचा...

पत्नीचा हनीट्रॅप प्रमाणे वापर, मुंबईतील दोन धनदांडग्यांच्या हत्या, सिमरन सूद-विजय पालांडे कसे लागले होते पोलिसांच्या हाती?
Follow us on

मुंबई : अरुणकुमार टिक्कू (Arun Tikku) आणि करण कक्कड (Karan Kakkad) दुहेरी हत्याकांडाने 2012 मध्ये देशात खळबळ उडाली होती. विजय पालांडे आणि त्याची पत्नी-मॉडेल सिमरन सूद (Simran Sood) हत्या प्रकरणाचे मुख्य सूत्रधार होते. सिमरनचा हनीट्रॅप प्रमाणे वापर करुन मार्च 2012 मध्ये 28 वर्षीय उदयोन्मुख निर्माता करणकुमार कक्कड, तर एप्रिल 2012 मध्ये 67 वर्षीय व्यावसायिक अरुणकुमार टिक्कू या दोघांच्या मुंबईत हत्या करण्यात आल्या होत्या. दोघांचीही मालमत्ता हडपण्याच्या उद्देशाने त्यांचे जीव घेण्यात आले होते. पालांडेने आपले साथीदार धनंजय शिंदे आणि मनोज गजकोश यांच्या मदतीने या हत्या केल्याचा आरोप होता.

काय आहे प्रकरण?

6 मार्च 2012… दिल्लीतील 28 वर्षीय उदयोन्मुख निर्माता करणकुमार कक्कड बेपत्ता झाला. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर कक्कडच्या अपहरण आणि हत्या प्रकरणात सिमरनला चौकशीला बोलावण्यात आलं. मात्र आपल्याला काहीच माहिती नसल्याचं सांगितल्याने सिमरनला सोडून देण्यात आलं होतं.

अरुणकुमार टिक्कू हत्या

दुसरीकडे, अरुणकुमार टिक्कू यांचा अभिनेता पुत्र अनुज टिक्कू याच्याशी विजय पालांडेने मैत्री केली होती. मुंबईतील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये असलेला आलिशान फ्लॅट लाटण्यासाठी पालांडेने जाळं पसरलं होतं. पालांडे त्यांच्या घरात भाडेकरु म्हणून राहत होता. सात एप्रिल 2012 रोजी टिक्कू यांचा मृतदेह अंधेरीतील त्यांच्या राहत्या घरी सापडला होता. त्यावेळी पालांडेला संशयातून पोलिसांनी उचललं. मात्र त्यानेही थातुरमातुर उत्तरं देत पोलिसांची दिशाभूल केली. अखेर पोलिसांनी कसून चौकशी केल्यावर पालांडेने हत्येची कबुली दिली.

करणकुमार कक्कडच्या शरीराचे तुकडे

त्याच वेळी वाचा फुटली करणकुमारच्या हत्या प्रकरणाला. कक्कडची शानदार बीएमडब्ल्यू कार आणि क्रेडिट कार्ड मिळवण्यासाठी सिमरनने त्याच्या आलिशान अपार्टमेंटमध्येच त्याची हत्या केली होती. त्यानंतर त्याच्या शरीराचे लहान-लहान तुकडे करुन साताऱ्यातील कुंभार्ली घाटात फेकल्याचं तपासात समोर आलं. आपले शेजारी (सूद) आणि त्यांचा भाऊ आपली ओळख एका फायनान्सरशी करुन देणार आहेत, हा करणने आपल्या मोठ्या भावाला सांगितलेला दुवा पोलिस तपासात मोठा ठरला. सिमरनला हत्या प्रकरणात अटक करण्यात आली.

कोण आहे सिमरन सूद

सिमरन म्हणजे मूळची लुधियानाची कला शाखा पदवीधर सीमा सुंदरनाथ दोसांज. 1990 च्या सुमारास फिल्म इंडस्ट्रीमध्ये करिअर करण्यासाठी ती मुंबईला आली होती. ज्या जिममध्ये ती जायची, तिथे जवळच्या एका रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्या विजयशी तिची ओळख झाली आणि दोघं प्रेमात पडले. तरुण दिसण्याचे प्रयत्न करण्यासाठी तिने यूएस आणि दुबईमध्ये अनेक प्लॅस्टिक सर्जरीही करुन घेतल्या होत्या. पेज थ्री वर्तुळात तिची उठबस असायची. आयपीएलच्या पार्टींनाही ती हजेरी लावायची.

रिअल लाईफ बंटी बबली

1998 मध्ये त्यांनी लग्न केलं, मात्र त्याची नोंदणी झाली नव्हती. पती विजय पालांडेची ओळख ती बरेच वेळा भाऊ अशी करुन द्यायची. त्यामुळे एकट्या आणि श्रीमंत पुरुषांना आपल्या जाळ्यात अडकवायला त्यांना सोपं जायचं. पोलीस तपासातही तिने आधी विजय आणि आपण चांगले मित्र असल्याचं सांगितलं होतं. कधी बहीण-भाऊ, तर कधी मामा-भाचा अशी वेगवेगळी नातीही तिने सांगितली होती. मात्र प्रत्यक्षात हे बंटी बबली नवरा-बायको असल्याचं समोर आलं.

अनुज टिक्कू, करणकुमार कक्कड यांनाही विजय पालांडे सिमरनचा भाऊ करण सूद म्हणून भेटला होता. पालांडे हा संतोष शेट्टी गँगचा सदस्य असल्याची चर्चा होती. विजय पालांडेला 1998 मध्ये एका दुहेरी हत्याकांडात अटक झाली होती, 2003 मध्ये पॅरोलवर असताना तो पळून गेला. बँगकॉकला जाऊन त्याने प्लॅस्टिक सर्जरी केली. त्यानंतर 2005 मध्ये तो मुंबईत परतला. सात वर्षांनंतर दोघांनी पुन्हा आपला धंदा उघडला आणि दोन हकनाक बळी गेले.

संबंधित बातम्या :

Amar Singh Chamkila | प्रेग्नंट पत्नीसह झालेली गायक अमरसिंग चमकिलाची हत्या, 33 वर्षांनंतरही गूढ कायम

अपहरणानंतरचा व्हिडीओ पाहून वडील गेले होते पोलिसात, जीवलग मित्रानेच केलेली 19 वर्षांच्या विद्यार्थ्याची हत्या