नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत

बुलडाणा जिल्ह्यात एका तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली.

नदीपात्रात गेला, सेल्फी काढायला लागला, पण पाय घसरला, बुलडाण्यात तरुणाचा दुर्देवी अंत
प्रातिनिधिक फोटो
| Edited By: | Updated on: Aug 22, 2021 | 7:08 PM

बुलडाणा : बुलडाणा जिल्ह्यात एका तरुणाचा नदीपात्रात बुडून दुर्देवी मृत्यू झाला आहे. संग्रामपूर तालुक्यातील वारी येथील वान नदीपात्रात ही घटना घडली. या घटनेनंतर काही तासांनी 24 वर्षीय अनिल सरोकार या तरुणाचा तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात मृतदेह आढळला. या घटनेमुळे खांडवी गावात शोकाकूळ वातावरण आहे. घरातील तरुणाचं निधन झाल्याने कुटुंबीयांनी टाहो फोडत आक्रोश केला.

पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने कुणी वाचवू शकलं नाही

अनिल सरोकार हा तरुण शनिवारी (21 ऑगस्ट) दुपारी सेल्फी काढण्यासाठी वान नदीपात्रात उतरला होता. या दरम्यान सेल्फी काढत असतानाच त्याचा पाय घसरल्याने तो नदीपात्रात पडून वाहून गेला. त्यावेळी दुर्घटनास्थळी अनेक लोकांची उपस्थिती होती. पण पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने युवाकाला वाचविण्यासाठी कुणी प्रयत्न केले नाही.

शोध मोहिमेनंतर तरुणाचा मृतदेह सापडला

हनुमान सागर धरणाचे दिवसभर चार दरवाजे उघडण्यात आले होते. त्यामुळे वान नदीला प्रचंड पूर आला होता. या पुराच्या पाण्यात युवक वाहून गेला. युवकाच्या नातेवाईकांनी या घटनेची माहिती सोनाळा पोलीस स्टेशनला दिल्यानंतर पोलिसांकडून नदीपात्रात वाहून गेलेल्या युवकाला शोधण्यासाठी शोध मोहीम सुरु करण्यात आली होती. दरम्यान, तेल्हारा तालुक्यातील दानापूर येथील नदीपात्रात या युवकाचा मृतदेह आढळून आला.

पालघरमध्येही तरुणाचा धरणात बुडून मृत्यू

काही दिवसांपूर्वी पालघर जिल्ह्यात एका 17 वर्षीय तरुणाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला होता. सफाळे जवळील रोडखड पाडा धरणात युवकाचा मृत्यू झाला. तन्मेष विकास तरे असं पाण्यात बुडालेल्या युवकाचे नाव असून तो पालघर जिल्ह्यातील एडवन येथील रहिवाशी होता. तन्मेष तरे हा काही मुला-मुलींसोबत फिरायला गेला होता. त्याच्यासोबत मुला-मुलींचा मोठा ग्रुप होता. यावेळी रोडखड धरणाजवळ आल्यानंतर हा ग्रुप मस्ती करत होता. यातच काही जण धरणाच्या पाण्यात पोहण्यासाठी गेले. तन्मेष तरे हासुद्धा धरणात पोहण्यासाठी पाण्यात उतरला.

यावेळी धरणात पोहत असताना त्याला पाण्याच अंदाज आला नाही आणि तो पाण्यात बुडायला लागला. ही घटना घडल्यानंतर येथे एकच खळबळ उडाली. तन्मेषच्या मित्रांनी आरडाओरड केल्यानंतर धरणाजवळ काही लोकांनी धाव घेतली. या लोकांनी तन्मेषला पाण्याच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना यश आले नाही. पाण्यात बुडून तन्मेषचा मृत्यू झाला.

हेही वाचा :

पती गुन्हेगार होताच, पण पत्नीचा क्रूरतेला कळस, जोडीदाराला संपवलं, नंतर घरातच गाडलं, मुंबईतील भयानक घटना

चोरट्याने तब्बल 20 तिजोऱ्या फोडल्या, इचलकरंजीत गोविंदराव कॉलेजमध्ये 4 लाखांची चोरी, सीसीटीव्हीत चोर कैद